शिवशाहिरांचे वैकुंठगमन...

    21-Nov-2021
Total Views | 183

babasaheb _1  H




श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल १४ नोव्हेंबरच्या रात्री प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली. मन मानायला तयार नव्हते. पण, कुठेतरी नकळत वाटलं की सगळं पुन्हा पूर्ववत होईल. पण, दि. १५ नोव्हेंबर सोमवार कार्तिकी एकादशीला सकाळी बातमी आली की ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचे वैकुंठागमन झाले. इतिहासपुरुषाचे जाणे मन सुन्न करून गेले. विचारांचे काहूर मनात दाटून आले. त्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...



 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या युगपुरूषांबद्दल काही बोलणे म्हणजे, सूर्याला दीप दाखवण्यासारखे आहे. इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे होते. सुरुवात कुठून करावी, हेच सुचत नव्हतं... आणि नकळत मनाने त्यांच्या व्यक्तित्वात डोकावून पाहिले... तेव्हा जे गवसलं... ते असं.. श्री. बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे. जन्म पुणे येथे दि. २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्या दिवशी भारतीय सौर पंचांगात ’नागपंचमी’ ही तिथी होती. पुरंदरे घराणे म्हणजे सरदार घराणे. घरात बोलण्याची पद्धत खानदानी होती. एकमेकांना ’अहो-जाहो’ संबोधणे असे. त्यामुळेच त्यांना ’बाबासाहेब’ असे संबोधले जाऊ लागले.
 
 
जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही पुरंदर्‍यांची कुलदैवते. घरात धार्मिक वातावरण होते. खंडोबाचे, देवीचे नवरात्र, इतर सगळे सणवार-उत्सव साजरे केले जात. शिवाय पर्वतीवर वतनानुसार रोज सकाळ-सायंकाळ जाऊन श्रीविष्णूची पूजाही केली जात असे आणि त्या वेळपासून आजपर्यंत ती प्रथा तशीच चालू आहे. काही काळ बाबासाहेबही या पूजेसाठी रोज पर्वतीवर जात. परंतु, पुढे व्याख्यानमाला, लेखनासाठी प्रवास घडू लागल्याने त्यांचे पुतणे विश्वासराव यांना त्यांनी पर्वतीवर पूजेस जाण्यास सांगितले. बाबासाहेब देवभक्त होते, परंतु देवभोळे नव्हते. घरातल्या या धार्मिक वातावरणाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम त्यांच्या आचारविचारांतून व्यक्त होताना दिसत होता. वडिलांच्या शैलीदार बोलण्याची विलक्षण मोहिनी त्यांच्या मनावर बसली होती. वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी, हकिकती वाड्याच्या आजूबाजूच्या मुलांना जशाच्या तशा सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब करू लागले होते आणि त्यावेळीच त्यांच्यातील ’कथनशैली’चा जन्म झाला होता. आपल्या वडिलांइतका दुसरा मोठा गुरू नाही असे त्यांना वाटायचे.
 
 
बाबासाहेब वडिलांना ‘मामासाहेब’ म्हणत. ते उत्तम चित्रकार होते. बाबासाहेबांना घडविण्यात मामासाहेबांचा फारच मोठा वाटा. त्यांचे भारदस्त, पेशवाई थाटाचे व्यक्तिमत्त्व, धारदार आवाज, दांडगे वाचन, जबरदस्त पाठांतर होते. त्यांनी मुलांना इतिहासातल्या हकिकती, घराण्यातल्या गोष्टी, गडकोटांची, जुन्या वाड्याहुड्यांची वर्णने, शस्त्रास्त्रांची माहिती, स्त्री-पुरुषांचे जुने दागदागिने आणि खानदानी रीतिरिवाज तपशीलवार सांगितले, शिकारकथा सांगितल्या. महायुद्धाच्या शौर्यकथा, कधी बारभाईंचे कारस्थान, एखाद्या सतीचे गमन या गोष्टी ते इतक्या हुबेहूब सांगत की, दोन दिवस डोळ्यांपुढून तो प्रसंग हलत नसे. भुताखेतांच्या गोष्टी मात्र चुकूनही त्यांनी कधी सांगितल्या नाहीत. यातूनच बाबासाहेबांना इतिहासाची आवड निर्माण झाली होती.
 
 
प्लेगच्या साथीमुळे पुढे पुरंदरे कुटुंब सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे गावात राहायला आले. तेव्हा छोट्या बाबासाहेबांनी आपल्या वडिलांबरोबर सिंहगडावर चढून जाऊन सर्व किल्ला पाहिला आणि नंतर ते तिथे वारंवार जाऊ लागले. तिथेच त्यांच्या मनात शिवभक्तीचा जन्म झाला, तसेच इतिहासाची आवड उत्पन्न झाली. पुढे १९४९ मध्ये बाबासाहेबांचा विवाह ’माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी कुमुद यांच्याशी झाला. हीच कुमुद सोळाव्या वर्षी पुढे ‘निर्मला बळवंत पुरंदरे’ या नावाने पुरंदरे कुटुंबात समरसून गेली. इतक्या लहान वयात त्यांना खूप श्रीमंती आणि खूप गरिबीही अनुभवायला लागली. शिक्षण मॅट्रिक. माहेरी संकटांचा डोंगर कोसळलेला होता. शेवटी त्यांच्या आजीनं ठरवलं की जे आधी येतील त्यांना मुलगी देऊन टाकायची. सगळ्या बहिणींची लग्नं तशीच झाली. बाबासाहेब आणि निर्मला पुरंदरे यांचा संसार बहरू लागला होता. पुढे त्यांना तीन मुलं झाली. मोठी माधुरी. दोन नंबर अमृत आणि तीन नंबर प्रसाद.
 
 
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे इतिहासवेडे होते. किल्ले फिरणारे, इतिहासाची कागदपत्रं अभ्यासत इतिहास संशोधक मंडळात पडीक राहणारे. त्यामुळे सासरीसुद्धा आर्थिक संकटं आली. त्या परिस्थितीत निर्मलाताईंनी तीन मुलांना सांभाळत संसार केला. ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ ही निर्मलाताईंनी सुरू केलेली संस्था. ग्रामीण भागात मुलींना बालवाडी शिक्षणाची कशी गरज आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, बालवाडी शिक्षिका ग्रामीण भागांतूनच तयार केल्या तर बालवाड्या नक्की चालतील, ही निर्मलाताईंची कल्पना होती. आज शेकडो बालवाडी शिक्षिका तेवढ्याच बालवाड्या चालवत आहेत आणि हजारो मुलं, मुली त्याचा लाभ घेत आहेत.
 
 
१९५८ मध्ये ’राजा शिवछत्रपती’ हे बाबासाहेबांनी लिहिलेले चरित्र प्रकाशित झाले. १९६३ मध्ये छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्याकडून बाबासाहेबांना ’शिवशाहीर’ हा सन्मान बहाल करण्यात आला. त्यावेळच्या मानपत्रात म्हटले आहे- “बाबासाहेब, आपण शिवरायांचे सारे गडकोट किल्ले प्रत्यक्ष पाहिलेत. आग्रा ते राजगड असा ८५ दिवसांचा पायी प्रवास केलात. पन्हाळा ते विशाळगड अशी भर पावसात इतिहासातल्या त्याच तिथीला दौड केलीत. संशोधन, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष दर्शन यांमधूनच आपले लेखन घडत राहिले. ’जाळत्या ठिणग्या’, ’मुजर्‍याचे मानकरी’, ’दख्खनची दौलत’, ’प्रतापगड, ’लोहगड’, ’शिवनेरी’, ’आग्रा’, ’पुरंदर्‍यांची नौबत’, ’शिलंगणाचं सोनं’, ’महाराज’, ’शेलारखिंड’, ’राजा शिवछत्रपती’ इत्यादी आपली २५ ग्रंथांची निर्मिती महाराष्ट्र शारदेच्या दरबारास भूषण ठरली आहे. आपल्या लेखणीने आणि वाणीने लाखमोलाचे कार्य केले आहे. शिवचरित्रातून लोकजागृती नि लोकशिक्षण करून आपण राष्ट्रीयत्व, समत्व, बंधुत्व, मित्रत्व आणि ममत्व वाढीस लावलेत.”
 
 
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे ‘शिवशाहीर’ या बिरुदावलीत कायमच शोभून दिसत होते. छत्रपती घराण्याने ही पदवी त्यांना बहाल केली होती. त्यांनीही छत्रपतींचा मान म्हणून ही पदवी स्वतःच्या नावापूर्वी लावली आणि त्यातच ते समरसून गेले होते. प्रत्यक्ष राजमातांकडून हा सन्मान त्यांना मिळाला होता. बाबासाहेबांचे लेखन व व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून, बोलताना, ’शिवाजीने शाहिस्तेखानाची बोटे कापली’, ’शिवाजीने अफजलखानाचा वध केला’, ’शिवाजीची आगर्‍याहून सुटका’ असा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असे. परंतु, बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्राच्या विशेषत: त्यांच्या व्याख्यानांच्या प्रभावामुळे आता कोणीही तसा एकेरी उल्लेख करणे शक्य नाही, असे म्हणावयास हरकत नाही.
 
 
 
१९६७च्या एप्रिल महिन्यात ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ची स्थापना त्यांनी केली. १९७४च्या मे महिन्यात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांनी भव्य मोठे ’शिवसृष्टी’ या नावाचे प्रदर्शन आयोजित केले. असे प्रदर्शन कोणी आजतागायत कुठेही भरविल्याची नोंद नाही. ती ’शिवसृष्टी’ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली. सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी त्याला पसंतीची पावती दिली होती. न. र. फाटक सरांनी ’शिवसृष्टी चिरस्थायी व्हावी’ अशी इच्छा व्यक्त करताना म्हटले होते,
 
 
श्री. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेने मुंबईच्या शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेली भव्य ’शिवसृष्टी’ नजरेखाली घालण्याचा योग साधला. या ’सृष्टीत’ छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे सर्व पैलू, चित्रे व मूर्तिशिल्प या दोन्ही साधनांचा उपयोग करून दाखविले आहेत. ज्यांना शिवकालीन इतिहासाचे व महाराजांच्या पराक्रमाचे आणि जेथे तो पराक्रम घडला, त्या स्थळांचे चांगले ज्ञान असेल, त्यांना ‘शिवसृष्टी’तील दृश्ये पाहताना आपण शिवचरित्र काळातच वावरत आहेत असे वाटावे इतकी सजीवता ‘शिवसृष्टी’च्या उभारणीत नि:संशय आहे व त्यासाठी श्री शिवरायांचे एकान्तिक भक्त बाबासाहेब पुरंदरे यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच! ही सृष्टी पाहत असता मुंबई महापालिकेने अथवा महाराष्ट्र तिचा विस्तार करून या सृष्टीला चिरस्थायी स्वरूप का देऊ नये, असे सारखे मनात येत होते. जी कामे शासनाने करावी अशी कित्येक कामे बाबासाहेबांनी केली आहेत, त्यातलेच ‘शिवसृष्टी’ हे एक. भगीरथ प्रयत्नांतून उभारलेली ‘शिवसृष्टी’ आज पाहता आली.
 
 
ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी ’मुजर्‍याचे मानकरी’, ’जाळत्या ठिणग्या’, ’सावित्री’, ’पुरंदरच्या बुरुजावरुन’, ’पुरंदर्‍यांची नौबत’, ’पुरंदर्‍यांची दौलत’, ’पुरंदर्‍यांचा सरकारवाडा’, ’कलावंतिणीचा सज्जा’ हे कथासंग्रह, ’लालमहालातील लक्ष्मी’, ’मी रायगड बोलतोय’, ’झुंजारबुरुज’, ’महाराजांची राजचिन्हे’ ही छोटी पुस्तके आणि ’आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे’ ही वृत्तपत्रातील लेखमाला, ’राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र, ’महाराज’ हे सचित्र शिवचरित्र, ’आग्रा’, ’पुरंदर’, ’लालमहाल’, ’सिंहगड’, ’पन्हाळगड’, ’राजगड’, ’प्रतापगड’ ही गडसंचातील सात पुस्तके, शिलंगणाचं सोनं’, ’शेलारखिंड’ या दोन कादंबर्‍या, ’जाणता राजा’ हे महानाट्य असे लेखन केले आहे.
 
 
बाबासाहेबांनी १९५२ ते १९६० या कालखंडात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेली नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी ठरली होती. वास्तविक तेथील दप्तरे, ऐतिहासिक कागदपत्रे अनेकांनी वाचली, अभ्यासली असतील. परंतु, बाबासाहेबांनी त्यांचा योग्य तो उपयोग करून, माहितीचा आधार घेऊन आपल्या साहित्याची निर्मिती केली. म्हणजे सुवर्णकण वेचून त्यातून सुरेखसे, नक्षीदार, टिकाऊ अलंकार निर्माण केले आणि आज जगभरातील मराठी घराघरात ही ग्रंथसंपदा मोठ्या सन्मानाने मिरवते आहे, वाचण्यासाठी खुणावते आहे आणि तो ऐवज पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.
 
 
विचारांची, भाषेची, उच्चाराची शुद्धता, सखोल चिंतन, विचार ठामपणे मांडण्याची शैली असा बाबासाहेबांचा एकंदर वाग्वैभव-विलास बघितला की सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याची खात्री पटते. इतिहास आणि साहित्य यासंबंधी विचार करत असताना विशेषत्वाने ‘ब. मो. पुरंदरे’ हे नाव ओलांडून अथवा या नावाकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊच शकत नाही. वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. इतिहासाचं वेड लागावं लागतं. “शिवाजी महाराजांचा इतिहास हा ’वेड्यांचा इतिहास आहे,” या पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ’शिवचरित्राचे वेड लागले आणि त्यातूनच त्यांच्या लेखणी-वाणीने एक इतिहास घडविला’ असे म्हणावे लागेल. पुढे ते असेही म्हणतात, ”इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उठेल, तो इतिहासाचाच!” आणि खरोखरीच त्यांनी छत्रपतींचा इतिहास हृदयात उसळता ठेवला!
 
 
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल जाणून घेताना त्यांच्या ’जाणता राजा’ या महानाट्याविषयी माहिती नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. १९८५ मध्ये बाबासाहेबांनी एक नवीनच प्रयोग- लेखन, दिग्दर्शन, सादरीकरणामध्ये केला. तो म्हणजे ’जाणता राजा’ या महानाट्याचा! समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाप्रसंगी लिहिलेल्या पत्रातील ’जाणता राजा’ हे संबोधन म्हणजे या नाटकाचे शीर्षक होय. बाबासाहेबांनी ’जाणता राजा’ हे शिवाजी महाराजांवरील नाटक लिहिले आणि ते रंगमंचावरही सादर केले. जगातील तिसर्‍या क्रमांकाचे हे ’बॅले’ स्वरूपाचे महानाट्य मानले जाते. याचे आतापर्यंत काही हजार प्रयोग झाले आहेत.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे केवळ मुजरे, लढाया आणि राज्याभिषेक एवढ्यापुरतं नाही, तर त्यांचा राज्यकारभार, प्रशासन, त्यांचं युद्धशास्त्र, माणसं हेरण्याचं आणि त्याला योग्य कामगिरी सोपवण्याचं त्यांचं कसब, त्यांची भविष्याकडं लागलेली नजर, राज्यविस्ताराच्या त्यांच्या योजना, प्रजेची काळजी, कायम सावधपणा, समाजातील साधू-सज्जनांप्रती त्यांच्याजवळ असलेला आदरभाव, मेल्यावरही शत्रूचा अपमान न करण्याची त्यांच्याकडील उदात्त माणुसकी, आपल्या सहकार्‍यांवरील प्रेम, निष्ठावंतांचं आणि कर्तबगार मंडळींचं खुद्द महाराजांकडून आठवणीनं केलं जाणारं कौतुक या सार्‍या गोष्टींकडं सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्याचे सार म्हणजे ’जाणता राजा.’ कारण, या महानाट्यातील प्रत्येक प्रसंगातून या सार्‍या गोष्टी प्रतिबिंबित झाल्या आहेत. शिवशाहीर बाबासाहेबांच्या पैलूंबद्दल आपण जाणून घेताना त्यांच्या छंदांबद्दल वाचलं की आश्चर्य वाटतं. ऐतिहासिक लेखन या छंदासोबत बाबासाहेबांचा आवडता छंद म्हणजे अश्वपालन अर्थात घोडे पाळण्याचा छंद होता. मराठी भाषेच्या आणि वक्तृत्वाच्या इतिहासात बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे हा एक स्वतंत्र विषय मानावा लागेल.
 
 
गेली पाच तपे हजारोंच्या संख्येने मराठी माणसे बाबासाहेबांच्या व्याख्यानांना हजर असत. शहरे, खेडी, सहकारी कारखाने, वाड्या, वस्त्या यातून व्याख्यानाच्या दिशेने माणसांची रीघ लागलेली दिसायची. आजच्या काळात तिकिटे ठेवून व्याख्यानमाला चालणे कठीण! अशाही काळात आठ-आठ, दहा-दहा हजार श्रोते सात दिवसांच्या व्याख्यानमालेला नियमित येत होते, ही पुरंदरे यांच्या वक्तृत्वाला मिळालेली सार्थ अशी पावती आहे. तीच ती व्याख्याने पुन:पुन्हा ऐकवण्याचा आग्रह त्यांना होत होता. आज ही गोष्ट व्याख्यानांच्या बाबतीत दुर्मीळ आहे. त्यांच्या वक्तृत्वाने प्रादेशिक सीमा ओलांडल्या होत्या. त्यांच्या व्याख्यानांनी दुबई, अमेरिका, इंग्लंडपर्यंत विक्रम केले आहेत. त्यांच्या वक्तृत्वाचा लाभ तीन पिढ्यांना झाला आहे. शिवाय ध्वनिमुद्रणाच्या रूपाने जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचलेला होता, नव्हे या तांत्रिक युगात पोहोचत राहील. बाबासाहेबांची ही वक्तृत्वकला त्यांनी लहानपणापासून ऐकलेल्या व स्वत: केलेल्या कीर्तनातून उदयास आली होती, त्याबद्दल ते त्यांच्या जाहीर मुलाखतीतून कायमच सांगत असत.
 
 
शिवचरित्र गाताना त्यांच्या वाणीतून वैनगंगा, पैनगंगा, बाणगंगा, गोदा, कृष्णा, पूर्णा आणि इंद्रायणी या महाराष्ट्राच्या गंगा त्यांच्या जिव्हेतून दूधसागराप्रमाणे फेसाळत बाहेर पडत आहेत की काय, असा साक्षात्कार होत असे. शिवरायांच्या अथांग पराक्रमाचा इतिहास मराठी लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचवला पाहिजे, हृदयापर्यंत धडकला पाहिजे, इतकेच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे, हाच त्यांचा अट्टहास होता आणि त्यासाठी ते आग्रही असायचे. व्याख्यानामागील दृष्टिकोन त्यांच्याच शब्दात सांगायचा झाल्यास, तो असा सांगता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि एकूणच शिवकाल यांच्याकडे आपण डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. केवळ भावनेच्या आहारी जाऊन जयजयकारात गुंतून पडण्यात काही अर्थ नाही. महाराज हे युगपुरुष होते. पण, आपण त्यांना देव मानू लागलो. त्यांची पूजा करतो. एकदा देवत्व बहाल केले की आपले काम झाले असे आपल्याला वाटते. शिवचरित्रातील प्रेरणादायक प्रसंगांच्याही पलीकडे जाऊन आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा, विवेकाचा, श्रद्धांचा आणि मूल्यनिष्ठेचा शोध घेतला पाहिजे. हार, तुरे, पालख्या आणि पुतळे यांतच गुंतून पडण्यापेक्षा शिवचरित्रातील विचारधनाचे अनुकरण व आचरणच आज गरजेचे आहे.
 
 
बाबासाहेबांचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दानशूरपणा अर्थात दातृत्व! आपल्याला जमेल तेवढं दान करणं, सतत करीत राहणं ही पुरंदरे घराण्याची परंपरा आहे, आमची ती वहिवाट आहे, तो रिवाज आहे’ अशा शब्दांत आनंद व्यक्त करणारे बाबासाहेब त्याबाबतचे तपशील सांगण्यास मात्र कायम संकोच करत होते. सहसा दान करण्याची एकही संधी बाबासाहेब सोडत नसत, असंच त्यांच्या जीवनप्रवासातून दिसतं. मंदिरं, दर्गे, मशिदी, रुग्णालयं, शिक्षणसंस्था, कलावंत, गरीब आणि गरजू,विद्यार्थी, लोककलाकार, सर्व जाती-धर्मातील ज्ञानोपासक अशा सर्वांनाच बाबासाहेबांचे दानशूर हात वेळोवेळी मायेचा आधार देत आले होते. आपल्याकडं जे-जे असेल ते-ते समोरच्या गरजू माणसाला देऊन टाकणं, अगदी सणावारी घातलेले अंगावरचे उंची कपडेसुद्धा. इथंपर्यंत बाबासाहेब ज्ञानवंत, दानवंत झालेले दिसत होते. समोरच्या व्यक्तीच्या गरिबीला, त्याच्या विपरीत परिस्थितीला जणू काही आपणच जबाबदार आहोत असं मानून त्याच्या बाबतीत जे-जे करता येईल ते-ते करण्याची त्यांची धडपड पाहिली की अक्षरशः थक्क व्हायला होतं. गरजू विद्यार्थ्यांना आपल्या घरी सन्मानानं ठेवून घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे शक्य आहे, ते ते करणं ही पुरंदरे घराण्याची परंपरा आहे. या पद्धतीने पुरंदरे वाड्यात राहून शिक्षण घेऊन आयुष्यात पुढं गेलेल्यांची तर किती तरी उदाहरणं सांगता येतील.
 
 
बाबासाहेबांच्या वाढणार्‍या वयाबरोबर त्यांचा काम करण्याचा उत्साहही वाढणाराच होता. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यमग्न होते. कारण, ‘शिवसृष्टी’चे स्वप्न बघितलेल्या बाबासाहेबांनी ते पूर्णत्वास नेण्यासाठी जगभ्रमंती केली आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत या न्यायाने सर्वोत्तम असे सारे ‘शिवसृष्टी’त आपल्याला बघता यावे यासाठी त्यांचा सततचा ध्यास मंत्रमुग्ध करणारा होता पुणे-बंगळुरु महामार्गावरील ही ‘शिवसृष्टी’देखील पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव ठरणार आहे. पुण्याजवळ आंबेगाव बुद्रुक येथे त्यांना भव्य स्वरूपात ‘शिवसृष्टी’ उभी करायची होती आणि त्याचे एक चतुर्थांश कामही झाले आहे. त्याबद्दल ते म्हणतात, ”माझी भविष्यात काही स्वप्नं आहेत. ती भव्य-दिव्य आणि अफाट आहेत असं म्हणावं लागेल. भव्य तटबंदी असलेला आणि सर्व ऐतिहासिक वैशिष्ट्य असलेला एक भला-थोरला किल्लाच उभारायचा आणि त्यामध्ये शिवकालीन एका नगराचीच उभारणी करायची असा हा प्रकल्प आहे.
 
 
तटबंदी, बुरुज, अश्वारोहण केंद्र, व्यायाम शाळा, सिंधुदुर्ग देखावा, खिंड-घाट, लोककला केंद्र, नगारखाना, पालखी दरवाजा, महादरवाजा, बाजारपेठ, पुष्करणी तलाव, वस्तुसंग्रहालय, शस्त्रसंग्रहालय, ध्वनी-प्रकाश योजना, ग्रंथालय, अभ्यासकांसाठी वसतिगृह अशा स्वरूपातील या ‘शिवसृष्टी’मध्ये येणार्‍या शिवभक्तांना अगदी शिवकाळच अनुभवता यावा, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. इथं दसरा होईल तो शिवकालीन! त्यावेळची जीवनपद्धती इथं सजीव स्वरूपात पाहता यावी, अनुभवता यावी, आपला वैभवशाली इतिहास अन् वारसा नव्या पिढीनं न्याहाळावा आणि त्यांच्या तो जगण्यात उतरावा ही या सार्‍या योजनेमागची तळमळ आहे. सुमारे ९० कोटी रुपयांची ही योजना होती. महागाईने खर्चाच्या अंदाजपत्रकात नेहमीच वाढ होत असते. पण, वृक्षारोपण, अश्वारोहण केंद्र इथं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यातील किल्लेदाराच्या वाड्याचं कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
 
 
पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच १००व्या वर्षात पदार्पण केले होते. विलक्षण ऊर्जेचे धनी असलेल्या बाबासाहेबांना भेटून ती अक्षय ऊर्जा आजही जाणवत होती. शतकाच्या उंबरठ्यावर असतानासुद्धा ‘शिवाजी’ या अक्षराचा ध्यास घेतलेले बाबासाहेब बोलायला लागले की आश्चर्य वाटायचे. त्यांचं निखळ हास्य आणि नमस्कार केल्यावर पाठीवरून फिरवेलला हात याला तर शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही. जिथे शब्द संपतात आणि फक्त सहवासात अनुभूतीपूर्ण असलेले क्षण कसे असतात, हे अनुभवण्याचे भाग्य म्हणजे बाबासाहेबांना भेटणे होते. बाबासाहेबांचा कॅनव्हास प्रचंड मोठा आहे. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या प्रवासात सावलीसारखी अनेक माणसं आली. त्यांच्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. बाबासाहेबांच्या शिवकथेत... न्हाऊन निघालेला महाराष्ट्र आपल्या तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवेल आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदवनभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील हे सर्व घडावे, यासाठी इतिहासपुत्रा, आपली अक्षय्य ऊर्जा आम्हाला हे कार्य धगधगत ठेवण्यासाठी सतत प्रेरणा देत राहो, हीच प्रार्थना आहे.
 
 
बा. भ. बोरकरांच्या शब्दातून एवढेच म्हणावेसे वाटते,
 
 
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
 
 
८६६८५४११८१

- सर्वेश फडणवीस
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121