ठाणे : लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.त्यानुसार एसटीची सेवा सुरळीत होती.मात्र,बेस्ट आणि ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसेस रस्त्यावर न उतरल्याने प्रवाश्यांचे हाल झाले. ठाणे व मुंबईत शिवसेनेची सत्ता असल्याने टीएमटी व बेस्ट सेवा बंद करण्यात आल्याची कुजबुज रंगली आहे. परिवहन सेवेतील शिवसेना युनियनच्या दबावामुळेच प्रशासनाने सेवा बंद ठेवल्याचा आरोप होत आहे.दरम्यान, टीएमटी आधीच डबघाईला आली असताना या बंदमुळे तब्बल १८ लाखांचा तोटा परिवहनला सोसावा लागला आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीनंतर शिवसेना व राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.त्यानुसार पहाटे पावणेतीन वाजताची पहिली टीएमटी बस युनियनच्या दबावामुळे आगारातच रोखण्यात आली.त्यामुळे सॅटीसवर सकाळच्या सत्रत प्रवाशांचे ,कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. बसेसच नसल्याने टीएमटीचे कर्मचारीही आगारात पोहोचु शकले नाहीत.केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही.
काही कर्मचारी सकाळच्या सत्रात आगारात आले होते. परंतु युनियनच्या दबावामुळे त्यांनी देखील काम करण्यास नकार दिल्याचे समजते. कामावर जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षावर अवलंबून राहावे लागले. दरम्यान,आधीच कोरोनामुळे टीएमटी तोटय़ात गेली आहे.१०० हून अधिक बसेस किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात धुळ खात पडून आहेत, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झालेला आहे.असे असतांना सोमवारच्या बंदमुळे टीएमटीला १८ लाखांचा तोटा सहन करावा लागल्याचे परिवहन सुत्रांनी सांगितले.
बंदमध्येही धुसफूस!
सोमवारच्या बंदमध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयापासून सकाळी शहरभर रॅली काढण्यात आली.या रॅलीचे नेतृत्व आनंद परांजपे यांनी केले.ही रॅली जांभळी नाका येथे आली असता महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश वैती यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी व सेना एकत्र दिसली.तर, काँग्रेसच्या चारपाच पदाधिकाऱ्यांनी स्वबळ दाखवत बाजारपेठेत शतपावली केली.