‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांची सरकारवर टीका
मुंबई: वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश, महावितरणाने संबंधीत कार्यालयांना दिले आहेत. वीज कंपन्यांनी सर्वसामान्य लोकांना लॉकडाउनमध्ये भरमसाठ बिलं पाठवली होती. पण याविषयी तक्रार झाल्यानंतर त्यात सूट देऊ, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र आता सूट न देता, "बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करू" असा निर्णय विभागाने घेतला. आणि भाजप नेत्यांनी त्यावर चार्टर्ड विमानाने फिरणाऱ्या ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी असल्याचं म्हणत, टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपचे मीडिया प्रमुख आणि ‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी या सरकारच्या ऊर्जा विभागाच्या निर्णयावर म्हटले की, “पैसे भरले नाहीत तर वीज पुरवठा खंडित करू हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राचा वीज ग्राहक अतिशय प्रामाणिक आहे. तो अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करतो आहे. कोरोनाकाळाआधीची 'महावितरण'ची थकबाकी त्यांनी पूर्ण केली आहे. ग्राहक प्रामाणिकपणे वीजबिल भरणा करत आहेत. पण कोरोनाकाळात अव्वाच्या सव्वा बिलं देण्यात आली होती. आणि त्यात सूट देण्याच्या नुसत्या घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्या. सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत वाट पाहिली आणि निकालानंतर लगेच त्यांनी तुघलकी निर्णय घेतला आहे."
त्याचप्रमाणे "ग्राहकांची वीज बिलं माफ करणं शक्य नाही असं सांगितलं जात आहे. पण ऊर्जा मंत्री स्वत: मात्र चार्टर्ड विमानाने फिरत आहेत. बिल्डर्सना ५०टक्के प्रिमियममध्ये सूट देण्यात आली आहे. ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. तसेच सव्वा वर्षात चार-पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ऊर्जा विभागाला हे विभाग चालवायचं नाहीये फक्त स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. त्यांनी अशा परिस्थितीत घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही याला विरोध करू" असं रोखठोक मतही पाठक यांनी मांडले आहे.