मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली.
वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हे लोक मनसेचा झेंडा हाती घेणार आहेत. वरळीतील लोकांनी आदित्य ठाकरेंना निवडून दिलं होतं. परंतु काही महिन्यात येथील नागरिकांना त्यांच्या कामाची प्रचिती आली, अनेकांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे कृष्णकुंज निवासस्थानी या नागरिकांचा मनसेत प्रवेश होणार असल्याचे संतोष धुरींनी सांगितले.
याआधी औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना राणौत वादावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घातली होती. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असे सांगत राऊत यांनी राज ठाकरेंना साद घातली होती.