मुंबई : राज्यातील काही भाजपचे आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही चमत्कार घडू शकतो. असा दावा कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला होता. यावर आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केला असून ‘कॉंग्रेसला महाविकासआघाडीत कोण विचारत?’ असा सवाल केला आहे. तसेच, ‘सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत.’ असेही ते म्हणाले.
‘नको त्या विषय उकरून काढण्याऐवजी राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. प्रशासन कुठे आहे तेच दिसत नाही.’ अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. तसेच, कोणताही भाजप नेता नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंग नाईक निंबाळकर या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.