ठाणे : ठाणे शहरातील हॉटस्पॉट भागात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या कामात महिलांच्या संघाने देखील आपले कर्तव्य बजावले आहे. गेल्या चार दिवसांपासुन या रणरागिणींनी चेंदणी कोळीवाडा हा हॉटस्पॉट पिंजुन काढला. फीवर ओपीडी, औषध वाटप, घरोघरी सर्वेक्षण अशा माध्यमातुन कोरोनाची साखळी तोडण्याचे काम या महिला करीत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीनशे कार्यकर्ते, ३२ डॉक्टर, १८ नर्स, ११ राहत केंद्राच्या मदतीने ठाणे महानगरपालिका भागातील इंदिरा नगर, हनुमान नगर, रूपादेवी पाडा, राम नगर, किसन नगर, लोकमान्य नगर, परेरा नगर, चेंदणी कोळीवाडा याभागात गेल्या दोन महिन्यापासुन कोरोना मुक्त ठाणे हे अभियान राबवित आहेत. आत्तापर्यंत २५ हजार लोकसंख्येपर्यंत जनकल्याण समितीचे स्वयंसेवक पोहचले आहेत. यात त्यांनी १ हजाराहून अधिक रूग्ण तपासले, ३६६ ताप असलेल्या रूग्णांवर प्राथमिक उपचार केले. तर पन्नासहून अधिक कोरोना रूग्णांना शोधण्यात यश मिळवले आहे.
एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वेक्षण, फीवर क्लीनिक चालवणे, संशयित रूग्णांना क्वारंटाईनसाठी पाठवणे आदी कामे जनकल्याण समितीच्या माध्यमातुन सुरू असतांना दुसरीकडे नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून शहरातील मुंब्रा, कळवा खारेगांव, विटावा, ठाणे पुर्व, नौपाडा, खोपट, वृंदावन, वागळे, लोकमान्य, पोखरण, मानपाडा, वडवली यासह विविध भागात हजारहून अधिक कुटूंबांना आयुर्वेदिक काढा भरड तर साडे सात हजारहुन अधिक लोकांना आयुष काढा टॅबलेटचे वितरण केले.
जनकल्याण समितीच्या पुरूष स्वयंसेवकांसोबत महिलांच्या गटानेदेखील कोरोना मुक्त ठाण्याच्या कामात हिरीरीने सहभाग घेतला आहे. चेंदणी कोळीवाडा या हॉटस्पॉट परिसरात गेल्या चार दिवसांपासुन महिला कोरोना रणरागिणींनी या परिसरातील २००० घरातील ७२०० नागरिकांचे सर्वेक्षण करून तेथुन जवळपास शंभराहुन अधिक तापाचे रूग्ण शोधुन काढले. या गटाच्या सहकार्याने सुरू केलेल्या फीवर ओपीडीचा लाभ जवळपास दिडशे नागरिकांनी घेतला. याचसोबत या भागातील ७२०० इतक्या नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वृध्दीच्या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप महिला गटाने केले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप म्हाळवी यांनी आज प्रत्यक्ष हॉटस्पॉट भागात काम करीत असलेल्या यामहिलांची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढविला.
कोरोना साखळी तोडण्यासाठी घरोघरी जात असतांना नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. उच्चशिक्षित मुली आपल्या काळजीपोटी आपल्या दारात घेऊन कोरोनाच्या उच्चाटनासाठी काम करीत असल्याचे पाहून नागरिक देखील चांगला प्रतिसाद देत होते. आमच्या घरातुन देखील आम्हाला प्रोत्साहन मिळाले, एरवी काळजीपोटी कुणी आपल्या मुलांना बाहेर सोडत नाही मात्र जनकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास जात असल्याने घरच्यांनी देखील आम्हाला काम करण्याची मुभा दिले अशी भावना या महिलांनी व्यक्त केली.