नवी दिल्ली : सध्या भारतामध्ये कोरोनाने थैमान माजवले आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारत- पाक सामने व्हावे असे वक्तव्य केले होते. अशा खडतर परिस्थितीमध्ये कोरोनासाठी निधी उभारावा यासाठी त्याने हे वक्तव्य केले होते. यावर आता भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी सडेतोड उत्तर देत ‘आम्हाला या मार्गाने पैसे गोळा करायची गरज नाही’ अशा शब्दात खडसावले आहे.
“तुम्ही भावनिक होऊन म्हणू शकता की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळली गेली पाहिजे. पण सध्या सामने भरवणे ही प्राथमिकता मुळीच नाही आहे. जर तुम्हाला पैसेच हवे असतील, तर तुम्ही सीमेपलीकडून भारताविरोधात करत असलेला दहशतवाद थांबवा आणि तो पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी वापरा.” असा सल्ला त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना दिला.