मुंबई : अलिबागमधील मांडवा जेट्टीपासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली असून या बोटीतील सर्व प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याने एक मोठी घटना टाळली. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी ही बोट होती. मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना ही बोट उलटली. अंजठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी होते. बोटीतील सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. जेट्टीजवळ पोहोचत असताना अचानक ही बोट एका बाजूला कलंडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली पोलिसांची पेट्रोलिंग बोट मदतीला धावून गेली. पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन ८० प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहोचवण्यात आले. अन्य आठ जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले.
अजंठा कंपनीची ही लाकडी बोट होती. या बोटीची प्रवासी वाहनक्षमता ५० ते ६० आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंजठा बोटीतील प्रवाशी हादरुन गेले. सुदैवाने त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग बोट तिथे असल्याने मोठा अनर्थ टळला. तीन ते चार कंपन्या गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक करतात. इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. रायगड जिल्ह्यातंर्गत येणाऱ्या अलिबाग तालुका पर्यटनाने समृद्ध आहे. इथल्या वेगवेगळया समुद्र किनाऱ्यावर शनिवार-रविवार पर्यटक मोठया संख्येने येत असतात. रस्त्याऐवजी सागरी मार्गाने वेळ वाचत असल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची पहिली पसंती बोटीला असते. पण या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.