मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान होणार आहे. तसेच, ३० मार्च २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ठिकाणी सोमवारपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च २०२० रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे १८ मार्च २०२० पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. मतदान २९ मार्च २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- १३, रायगड- १, रत्नागिरी- ८, नाशीक- १०२, जळगाव- २, अहमनगर- २, नंदुरबार- ३८, पुणे- ६, सातारा- २, कोल्हापूर- ४, औरंगाबाद- ७, नांदेड- १००, अमरावती- ५२६, अकोला- १, यवतमाळ- ४६१, बुलडाणा- १, नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली - २९६ म्हणजे एकूण- १५७०.