नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना येथे सुरू आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसात ६ बाद २३३ धावा फलकावर लावल्या. कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची शानदार खेळी केली. शतकाकडे वाटचाल सुरू असताना तो धावबाद झाला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय सलामी जोडी अपयशी ठरली. पृथ्वी शॉ शून्यावर तर मयांक अग्रवाल (१७ धावा) पॅट कमिन्सच्या जबरदस्त स्वींग चेंडूंवर त्रिफळाचित झाला. त्यामुळे धावफलकावर ३२ धावांवर २ बाद अशी स्थिती होती. त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने मैदानावर जम बसवण्याचा प्रयत्न केला. संघाचे शतक फलकावर लागले असताना पुजारा (४३ धावा) बाद झाला. पुजारानंतर विराटने उपकर्णधार अजिंक्य रहाणेला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. मात्र, विराट कोहली ७४ धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत आठ शानदार चौकार लगावले.