
शरद पवारांची भूमिका आश्चर्यजनक असल्याचे वक्तव्य
मुंबई: "केंद्र सरकारचा कृषी कायद्यांबाबतचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या भल्याचा आहे. यासंदर्भातली कोंडी फोडण्यात केंद्र सरकार यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांना ते समजावून सांगू शकतील असा मला पूर्ण विश्वास आहे" असे म्हणत भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांबाबतच्या निर्णयाचे समर्थन केले. आज कृषी विधेयकासंदर्भात रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
याबरोबरच शरद पवार यांच्या बाबतीतही विचारलेल्या प्रश्नांना चित्रा वाघ यांनी उत्तरे दिली. स्वामिनाथन आयोगाची शिफारस करणारेच शरद पवार आहेत. तसेच आता जे कायदे देशात करायचे आहेत, ते आधीपासूनच महाराष्ट्रात लागू आहेत त्यामुळे राज्यामध्ये जे कायदे हितावह आहेत ते केंद्राने केल्यानंतर नुकसानीचे कसे ठरतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचप्रमाणे पत्रकारांनी शरद पवार यांची दुटप्पी भूमिका योग्य वाटते का? असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना त्या म्हणाल्या की,"सातत्याने आजवर त्या विषयासंबंधी बोलणारे आणि सांगणारे साहेब आज तेच विषय समोर आल्यानंतर तेच साहेब अशा पद्धतीची भूमिका घेतात हे आश्चर्यजनक आहे."