नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही बाहेरून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे वाढू नये व त्याचा ताण वैद्यकीय सेवेवर येऊ नये, याकरिता प्रभावी उपाययोजना म्हणून ‘सीआरपीएफ’ किंवा तत्सम यंत्रणा नियुक्त करण्याकामी राज्याचे गृहमंत्रीसह विविध मंत्रिगण, विरोधी पक्षनेते यांसह पोलीस अधिकार्यांशी त्यांनी चर्चा करत योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर दिला. कुलकर्णी यांनी या काळात घेतलेली भूमिका ही नाशिककर जनतेच्या आरोग्याचे हितरक्षण करणारी ठरली. नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती व मनोबल उत्तम राहण्यासाठी योगासने व प्राणायाम करण्यासंदर्भात आयुष मंत्रालयाद्वारा जनजागृती होण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंतीदेखील कुलकर्णी यांच्यामार्फत करण्यात आली.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकामी मनपाच्या विविध विभागांशी समन्वय साधण्याकामी प्रशासक म्हणून कुलकर्णी यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘कोरोनामुक्त नाशिक’साठी नागरिकांमध्ये प्रबोधन व जनजागृतीसाठी शहरातील नामवंत ४०० विविध संस्था, कामगार संघटना, शैक्षणिक संस्था, वकील संघटना, डॉक्टर्स संघटना व उद्योजकांच्या संघटना यांना नाशिक शहर लवकरच ‘ग्रीन झोन’मध्ये आणण्याकरिता प्रयत्न करण्याकरिता जाहीर आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पक्ष, नाशिक शहर यांच्यावतीने कोरोना विषाणू या साथरोगाच्या संकटकाळात कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीवर उपचार करताना व कामकाज करीत असताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असे एक हजार ‘पीपीई’ कीट साहित्य वैद्यकीय विभागास देण्यात आले. ‘आर्सेनिक अल्बम-30’चे वाटप करण्याकामी त्यांनी आयुक्तांना सूचित करत त्याच्या वाटपास प्राधान्य दिले. या गोळ्यांचे १२ हजार कुटुंबांना विनामूल्य वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रामधील व लगतच्या क्षेत्रामधील नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार जंतुनाशक फवारणी संबंधित विभागाकडून करून घेण्यात आली. संपूर्ण नाशिक शहरात कोरोनाबाबत जनजागृतीकरिता २५० होर्डिंग्ज जाहिरात महापौर यांच्या माध्यमातून लावण्यात आल्या. मनपा वैद्यकीय विभाग/आरोग्य विभाग तसेच इतर सर्व विभागप्रमुख यांच्यासमवेत वेळोवेळी चर्चा करून उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच मनपा अधिकारी यांच्यासमवेत आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सायंकाळी ५.३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा कुलकर्णी यांनी घेतला, जो आजही घेण्यात येत आहे.
शहरातील कोरोना संसर्गबाधित रुग्णसंख्या व त्यानुसार आवश्यक असलेले बेड, तसेच सध्याच्या आकडेवारीचा वेग बघता, भविष्यात किती रुग्णांकरिता बेड उपलब्ध होऊ शकतील, याबाबत वैद्यकीय विभागाकडून सातत्याने आढावा घेऊन त्याबाबतच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या कालावधीत नाशिक शहराची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, मृतांची संख्यादेखील वाढल्याने अंत्यविधीसाठी आवश्यक विद्युतदाहिनी कार्यान्वित करण्यात आली. अशा पद्धतीने कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सर्वांच्या साथीने यशस्वीपणे राबविण्यात आल्या. नागरिकांच्या सोयीसाठी ‘कोविड’ हेल्पलाईन क्रमांक कॉल सेंटर सुरू करण्यात आले. हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती देण्यात हेल्पलाईन नंबर उपलब्ध केले आहेत. याचा हजारो लोकांना उपयोग होत आहे.दि. २२ जुलैपासून आजतागायत मनपा बीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरभरात ‘रॅपिड अॅन्टिजेन’ टेस्ट ‘आरटीपीसीआर’ टेस्ट या ‘मिशन झिरो नाशिक’ उपक्रमांतर्गत अनेक नागरिकांनी तपासणी केली. त्याचा सर्वांना खूप उपयोग झाला व होतो आहे.
समाजसेवी कार्य करत असताना, महापौर कुलकर्णी यांना अनेक हृदय हेलावून टाकणारे अनुभव आले. मात्र, शहर नेतृत्वाचे दायित्व त्यांच्यावर असल्याने त्यांनी सर्वांचे दु:ख दूर करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळेच नाशिक शहरातील नागरिकांना कोरोना महामारीचा सामना करण्याकामी आत्मविश्वास जागृत झाला.पक्षपातळीवरील उत्तम सहकार्याबरोबरच कुलकर्णी यांना त्यांच्या कुटुंबाचाही मोठा हातभार लागला. पुत्र वैभव कुलकर्णी, मुलगी संध्याताई यांचे कार्यनियोजन याकामी नक्कीच महत्त्वाचे ठरले. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात कार्यरत असलेले नाना हे राजकारणापेक्षा जनसेवेसाठी खास करून ओळखले जातात. आपल्या प्रभागात त्यांनी नगरसेवक म्हणून केलेले कार्य हे आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सध्या महापौर म्हणून त्यांचे कार्य हे अनेकांसाठी पथदर्शक असेच आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात नाशिककर नागरिकांना उपाययोजना आणि आत्मविश्वास जागृत करणारे कार्य होण्याची खरी आस होती. महापौर या नात्याने सतीश नाना कुलकर्णी यांनी केलेले कार्य, घेतलेली भूमिका, विविध स्तरावर केलेला पाठपुरावा हा नाशिककर नागरिकांसाठी नक्कीच दिलासादायी असाच ठरला.आगामी काळातदेखील नागरिकांच्या विविधांगी समस्यांचे निराकरण करण्याकामी स्थायी उपाययोजना करणे आणि त्या दिशेने कार्य करत नागरिकांचे जीवनमान सुखावह करणे हेच कुलकर्णी यांचे उद्दिष्ट आहे. कुलकर्णी यांनी या काळात घेतलेली भूमिका ही नाशिककर जनतेच्या आरोग्याचे हितरक्षण करणारी ठरली.