नवी दिल्ली : सध्या भारतीय सैन्याची ताकद वाढावी म्हणून भारताने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अत्याधुनिक चिनूकनंतर आता भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. हे लढाऊ हेलिकॉप्टर असून शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. तसेच, यामध्ये ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्त करण्यात आले. भारताचे एअर मार्शल ए.एस बुटोला यांनी यावेळी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनिक अपाचे विमानांचा करार भारताने अमेरिकेशी केला असून जुलै २०१९पर्यंत सगळी विमाने वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मागच्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने भारताला अपाची हेलिकॉप्टर विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली. वायुसेनेच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.
कुख्यात दहशतवादी आणि अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी या लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. डोंगराळ भागात, कोणत्याही ऋतूमध्ये-पावसाळा, हिवाळा असो वा उन्हाळा ही हेलिकॉप्टर्स सहज आक्रमण करू शकतात. ५१६५ किलो वजन असलेल्या या विमानांचा ताशी वेग ३६५ किमी इतका आहे. काही क्षणांमध्ये शत्रूचे रनगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये झालेल्या युद्धांमध्ये अमेरिकेला या हेलिकॉप्टर्सची भरपूर मदत झाली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat