नवी दिल्ली : 'दहशतवादाविरोधात पाकने कठोर पावले उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तानदहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही', असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
'दहशतवाद आणि चर्चा एकत्र केली जाऊ शकत नाही. जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा', असे आवाहन त्यांनी पाकिस्तानला केले आहे. 'इंडियाज वर्ल्ड : मोदी गव्हर्नमेंट्स फॉरेन पॉलिसी’ या कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या.
भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे, असे मत यावेळी सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. 'जर पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात. आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही' असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat