आसाम : आसाममधील हजारो लोक नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाविरोधात तीव्र निषेध करत आहेत. आंदोलनकर्ते आता प्रवासी गाडयांना देखील आपले लक्ष्य करत आहेत. असाच एक प्रकार नहारकाटिया रेल्वे स्थानकात घडला. दरम्यान, स्थानकात रेल्वेच्या डब्यांना आग लावणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या घोळक्यातून प्रवाशांना वाचविण्यात लष्कराला यश आले. ही बाब गुरुवारी उघडकीस आली. सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की," जमावाने नाहरकटियात सिल्चर-दिब्रूगड ब्रह्मपुत्र एक्स्प्रेसला घेरले आणि तेथे त्यांनी एका डब्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात सैन्य सुरक्षा दलाचे जवान त्याठिकाणी पोहोचले आणि प्रवाशांना वाचविले."
ते म्हणाले की,"प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ मदतीची मागणी केली. तातडीने कारवाई करून सैन्य आणि आसाम रायफल्सच्या सैन्याने घटनास्थळी धाव घेतली व तातडीने जमावाला हाकलून दिले."
संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून आसाममध्ये खळबळ उडाली आहे. येथे याचा तीव्र विरोध केला जात आहे. सतत तीव्र निदर्शने होत आहेत, पोलिसांच्या गोळीबारात दोन लोकांचा मृत्यूही झाला आहे. त्याचबरोबर सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.झारखंड मध्ये निवडणूक सभांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आसाममधील हिंसक आंदोलनाला काँग्रेस नेते जबाबदार असल्याचे म्हणले. तसेच ही आंदोलने भडकवविण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.