तननुप्राणनिजावद् वर्णनानिपुण: कवि
अभिनवगुप्ताचे गुरू म्हणजे संस्कृतमधील अलंकारिक रचनांचे कर्ते भट्टतौत. त्यांच्या या ओळी कविचे वर्णन करतात. याचा स्वैर अर्थ असा की, प्रतिभा म्हणजे काय तर, तेजाच्या नित्यनियमित उन्मेषाने झळाळणारी बुद्धी आणि अशा प्रतिभेच्या तेजाचा संचार झाल्याने ज्याची वर्णनेही जिवंत भासतात तो कवी. मराठीचे भाग्य थोर की सर्व अपशकुनांवर मात करीत या ओळींची प्रचिती येण्याचा सोहळा अरुणा ढेरेंच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवला.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल यवतमाळ येथे झाला. साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘मळभ दाटून आले असताना पलीकडे उजेड आहे,’ असा विश्वास ठेऊन या संमेलनाच्या यशस्वितेसाठी झटलेल्या रसिकांचा आणि त्या कार्यकर्त्यांचा हा विजय होता. हा विजय त्यांच्या विश्वासाचे प्रतीक तर होताच पण त्याचबरोबर डॉ. अरुणा ढेरे यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचाही होता. साहित्य संमेलन गाजणे हे काही महाराष्ट्राला नवे नाही. पण यावर्षी ते ज्या कारणामुळे गाजले, त्याला मराठीच काय पण जगाच्या कुठल्याही संस्कृतीत क्षमा नाही. इतके होऊनही मराठी रसिकजनांनी बहिष्काराचे अस्त्र मोडून तोडून फेकून देऊन या संमेलनाला दणदणीत उपस्थिती नोंदविली. मदन येरावारांच्या आणि विनोद तावडेंच्या भाषणाच्या वेळी आलेले निषेधाचे फुटकळ सूर वगळले तर डॉ. अरुणा ढेरेंच्या सुमारे सव्वा तासाच्या भाषणात कोणीही कसलाही व्यत्यय आणला नाही. जिथे ठाम असायला हवे, तिथे त्या ठाम होत्या तरीसुद्धा त्यांच्या प्रतिभेचा तेजस्वी, निरंजनी प्रकाश उपस्थितांनी पुरेपूर अनुभवला. अशा मळभ दाटून आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणे म्हणजे खरोखरच धारेवर चालण्यासारखे होते. अरुणा ढेरेंनी हे शिवधनुष्य लिलया पेललेच पण लालित्यपूर्ण संवादाने संस्मरणीयदेखील करून ठेवले. येणारी अनेक वर्षे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे भाषण कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणून अरुणा ढेरेंचे भाषण सर्वसामान्य मराठी रसिक आठवत राहतील. मुळात एका विशिष्ट पार्श्वभूमीवर अरुणाताईंकडे हे अध्यक्षपद चालून आले. ज्या प्रकारची माणसे गेली काही वर्षे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर जाऊन बसली आणि ज्या प्रकारचे राजकारण करून ही मंडळी तिथे जाऊन पोहोचली, त्याची एक नैसर्गिक खंत मराठी साहित्य रसिकांमध्ये होती. अरुणा ढेरेंनी सुरुवातीपासूनच हे निमंत्रण नाकारले होते, पण महामंडळाच्या सर्वच शाखांनी एकमताने त्यांच्याकडे आर्जवे केली आणि त्या संमेलनाच्या अध्यक्षा झाला. या नंतरचा सगळाच घटनाक्रम अरुणा ढेरेंच्या सहिष्णुतेची कसोटी पाहणारा होता. आपल्या कंपूबाहेरचे कुणीतरी अध्यक्ष झाले, याचा राग एका गटाला होताच पण आयोजकांपैकी काहींनी त्यांचे भाषण पडेल अशा पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात केली. नयनतारा सहगलांना आणण्यासाठी ज्या साहित्यबाह्य शक्तींनी इथे प्रयत्न केले, त्यांना चार खडे बोल अरुणाताईंनी सुनावलेच पण एकदा बोलावून निमंत्रण परत घेण्याच्या पळपुट्या प्रकारावर त्यांनी कोरडेही ओेढले. या दरम्यान त्यांनी भूमिका घ्यावी आणि आपल्याच सुरात सूर मिसळावा म्हणून दबाव निर्माण करणाऱ्यांमध्ये कोण नव्हते? मराठीतल्या दोन अत्यंत मोठ्या प्रसारमाध्यमांचे संपादक होते. राजकारणी होते, लेखक होते, सामाजिक कार्यकर्ते होते. ‘साहित्य संमेलनात जाऊनच आपली भूमिका मांडेन,’ अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर तर या दबावाला अणुकुचीदार टोके आली. विवेकशून्य अशी विशेषणे लावण्याचे उद्योग स्वत:ला विचारवंत म्हणविणारे अनेक जण इथे करीतच होते. पण या दबावासमोर अरुणा ढेरे झुकल्या नाहीत. संमेलन यशस्वी व्हावे यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, इतक्या लांबवर येऊन पोहोचलेल्या सर्वसामान्य साहित्यप्रेमींचा मान त्यांनी राखला आणि त्या संमेलनाला हजर राहिल्या. त्यांच्या मार्दवपूर्ण आवाजातल्या भाषणाची गवसणी इतकी मोठी होती की, या साहित्य संमेलनाच्या विरोधात उभे ठाकून पर्यायी साहित्य संमेलने भरविणाऱ्यांनाही त्यांनी आपल्या कवेत घेतले. विचारवंत आपल्याच विचारांच्या अहंगंडात अडकलेला नसला की, तो किती सर्वसमावेशक होऊशकतो, त्याचे हे उदाहरण होते. मराठीतले कितीतरी दिग्गज या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत का पोहोचू शकले नाहीत? असा विवेकी सवालही त्यांनी उपस्थितांसमोर उभा केला. आयोजक संस्थांमध्ये बसलेले झारीतले शुक्राचार्य बाजूला टाकून कार्यकर्ते, मराठी साहित्यप्रेमी आणि संमेलनाच्या अध्यक्ष यांच्यात चाललेल्या एका सुखसंवादाच्या सेतूबंधनाचा महाराष्ट्र साक्षीदार झाला. आपल्या परंपरा, पुराणकाव्यातून आलेल्या जातककथा या साऱ्यांना वर्ज्य न मानता त्यांना आपल्या भाषणात योग्य ते स्थान देऊन अरुणा ढेरेंनी आपले भाषण केले. “संस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. त्यातले सगळे स्वीकारता येत नाही आणि सगळेच नाकारताही येत नाही,” असा विचार अरुणा ढेरे सातत्याने मांडत असतात. त्यांच्या या भाषणात याचाच प्रतिध्वनी ऐकायला मिळाला. प्रबळ ज्ञाननिष्ठा हे मूल्य अरुणा ढेरेंना आपल्या वडिलांकडून मिळालेले तत्त्व. त्यांचे तत्त्वपालन याच भाषणात ऐकायला मिळाले. ज्या असहिष्णुतेचा सामना ढेरे कुटुंबीयांनी रा. चिं. ढेरेंच्या वेळी केला, त्या तुलेनत आजचा दबाव काहीच नव्हता. त्यामुळे अरुणा ढेरे या दिव्यातून तावूनसुलाखून पार पडल्या. इतरांच्या दबावाला बळी न पडता आपल्या विवेकाला स्मरून त्यांनी भूमिका घेतली. वाङ्मयबाह्य कारणांसाठी किंवा राजकारणासाठी संमेलन वेठीस धरणाऱ्यांना त्यांनी जे खडे बोल सुनावले ते विचार करायला लावणारे आहेत. “झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करीत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का?” या त्यांच्या परखड सवालाचा रोख जळजळीत होता. नयनतारांची राजकीय अभिव्यक्ती त्याच्याशी सहमत असणं किंवा नसणं किंवा ती मते विवेकाने पारखण्याबाबतचे त्यांचे विवेचन अनुकरणीय मानावे असेच होते. इंद्रनाथ चौधरींनी आपल्या भाषणात सांगितलेली हजार वर्षांपूर्वीच्या घराण्याच्या कट्यारीची गोष्ट भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी होती.
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता
तननुप्राणनिजावद् वर्णनानिपुण: कवि
अभिनवगुप्ताचे गुरू म्हणजे संस्कृतमधील अलंकारिक रचनांचे कर्ते भट्टतौत. त्यांच्या या ओळी कवीचे वर्णन करतात. याचा स्वैर अर्थ असा की, प्रतिभा म्हणजे काय तर, तेजाच्या नित्यनियमित उन्मेषाने झळाळणारी बुद्धी आणि अशा प्रतिभेच्या तेजाचा संचार झाल्याने ज्याची वर्णनेही जिवंत भासतात तो कवी. मराठीचे भाग्य थोर की, सर्व अपशकुनांवर मात करीत या ओळींची प्रचिती येण्याचा सोहळा अरुणा ढेरेंच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/