सत्य परिस्थिती समजण्यासाठी व्यक्तीची भावनिक, तात्विक आणि वैचारिक परिपक्वता महत्त्वाची असते. कुठल्याही विवादित परिस्थितीत आपण तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास भावनांत वाहून न जाता स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहून काही गोष्टी स्वीकारणे शक्य आहे. पण, मनात कुठेतरी दोलायमान वा द्विधा परिस्थिती नसावी. वैचारिक पातळीवर नेहमी एक गुंतागुंतीची, द्विधा प्रवृत्तीची वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया चालू असते. विचारांची विकसनशीलता तशी पायरीपायरीने होत असते. या प्रत्येक पायरीवर आपण एखाद्या गोष्टीचे तथ्य बारकाईने पाहणे आवश्यक आहे.
माणूस हा इतर जीवित प्राणिमात्रांपासून वेगळा आहे. मनुष्यप्राणी हा शेवटी प्राणीच आहे. पण, त्यांच्यात काही वेगळे गुणधर्म असल्याने तो इतर प्राणिमात्रांपेक्षा खास आहे. असे म्हणतात की, माणसाकडे विचार करायची शक्ती आहे. इतर प्राणी आपण जेवढे समजतो, त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी करू शकतात. त्यांना भूक लागली तर ते आपली भूक शमविण्यासाठी खाण्याचे मार्ग शोधतील. झोप आली तर सुरक्षित जागी झोपतील. आपल्या सुरक्षिततेच्या आड कोणी आले, तर स्वसंरक्षणार्थ योग्य तो पवित्रा घेतील. म्हणजे, अन्न व निवारा या दोन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्याकडे प्राणिमात्रांचा कल असतो. त्यांच्या वागण्यात एक नैसर्गिक मर्यादा असते. अर्थात, माणूस हे या सार्या भूमिका करतच असतो. पण भूक, तहान, लैंगिकता आणि संरक्षण इत्यादींच्या पलीकडे माणसाचे बौद्धिक विचार जात असतात. प्राणी आपले विचार, भावना, उद्वेग माणूस ज्या पद्धतीने व्यक्त करू शकतो, त्या पद्धतीने प्राणी व्यक्त करू शकत नाहीत. माणूस याबाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे म्हणायला हरकत नाही. माणसाकडे स्वतःचे मन व्यक्त करण्याची क्षमता आहे. आपण आपल्याला रुचलेले व्यक्त करू शकतो. आपली मते मांडू शकतो. आपल्या वैचारिक ताकदीने जगात अनेक बदल घडवून आणू शकतो. आज आपल्याभोवती होत असलेल्या शहरीकरणातून माणूस जगात काय काय बदल घडवू शकतो, हे आपण पाहतच आहोत. अर्थात, हे जगात होणारे सगळे बदल विधायक आहे असे नाही. पण, माणसाकडे जगाला भौगोलिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या व माणुसकीच्या दृष्टिकोनातून बदल घडवायची क्षमता आहे, हे केव्हाच सिद्ध झाले आहे.
या सगळ्या पद्धतीचा बदल घडविण्याच्या क्षमतेत माणसाचे वेगळेपण दडले आहे. माणूस स्वप्नाळू आहे. स्वप्नातून कल्पनेच्या विश्वात रमायला माणसालाच जमते. कदाचित माणूस म्हणून आपल्याला दूरदृष्टी आहे, असे म्हणता येत नाही. बर्याचवेळा विश्वातले विघातक निर्णयसुद्धा माणसांनीच घेतले आहेत. पण, या सगळ्या विधायक आणि विघातक वैचारिक निर्णयांमुळे माणूस मात्र प्राणिमात्रांपेक्षा वेगळा ठरतो हे निश्चित. पण, माणूस म्हणून आपल्याला मनापासून जे वाटते, हृदयापासून जे येते, ते सत्य असते. बर्याचवेळा असेही होते की, जे आपल्याला सत्य वाटते, त्यावरच आपण पूर्ण विश्वास ठेवतो. ज्या कुणावर आपण विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीसुद्धा अशाच आपल्या विचारांच्या गंगाजळीत कधीतरी सामावलेल्या असतात. आपण आपल्या मनात विश्वास ठेवण्याची जी प्रक्रिया कळत-नकळत राबवत असतो, ती खूप कुतूहलाची गोष्ट आहे. मुळात आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या आकलनावर अवलंबून असते. आपण एखाद्या प्रसंगाकडे, व्यक्तींकडे वा परिस्थितीकडे कशा प्रकारे पहातो? आपली अपेक्षा काय आहे? आपल्याला त्यातून काय हवे आहे? यावर आपला एकंदरीत दृष्टिकोन अवलंबून असतो. तसे पाहिले तर आपण एखाद्या गोष्टींबद्दल वा व्यक्तींबद्दल दाखवलेला विश्वास आपल्या त्यासंबंधीचे आकलन आहे, तितकेच आपले आकलन आपल्या विश्वासावर अवलंबून आहे. हे सगळे आपण आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींची सत्यता कीतपत पडताळून पाहतो यावर अवलंबून आहे.
अर्थात सत्य हे मला भावलेले सत्य असते का? बर्याचवेळा प्रत्येकाला आपल्याला पटलेली गोष्ट, आपण विश्वास ठेवलेली व्यक्ती आणि आपल्या अनुभवातून रुचलेला प्रसंगच सत्य वाटतात, यात खूप काही चुकत आहे किंवा ती खूप विक्षिप्त गोष्ट आहे, असे म्हणता येत नाही. शेवटी प्रत्येक माणसाच्या मनात एक ‘मी’ राहत असतो. हा माणसातला ‘मी’ त्याच्या जीवंत अस्तित्वाचा एक महत्त्वाचा पुरावा असतो. हा पुरावा सिद्ध करत राहणे, माणसाला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक वाटते. याच आवश्यकतेतून आपण जे सांगतो वा अनुभवतो तेच सत्य आहे, असे मानवजातीला वाटते. इतके भव्य विचार दुसर्या कुणा प्राण्याचे असतील असे वाटत नाही. परंतु, या विचारात आपण कधीतरी भविष्यात फसू शकतो, हे माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणूनच ‘सत्य परिस्थिती ही मला पटणारी व दुसर्या कुणाला न पटणारी’ अशी नसते. सत्य परिस्थिती समजण्यासाठी व्यक्तीची भावनिक, तात्विक आणि वैचारिक परिपक्वता महत्त्वाची असते. कुठल्याही विवादित परिस्थितीत आपण तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास भावनांत वाहून न जाता स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहून काही गोष्टी स्वीकारणे शक्य आहे. पण, मनात कुठेतरी दोलायमान वा द्विधा परिस्थिती नसावी. वैचारिक पातळीवर नेहमी एक गुंतागुंतीची, द्विधा प्रवृत्तीची वेगवेगळ्या पद्धतीची प्रक्रिया चालू असते. विचारांची विकसनशीलता तशी पायरीपायरीने होत असते. या प्रत्येक पायरीवर आपण एखाद्या गोष्टीचे तथ्य बारकाईने पाहणे आवश्यक आहे. या गोष्टींचे अवलोकन करताना आपल्या विचारांशी हुशारीने व यथार्थपणे आपण सामोरे जातो, तेव्हाच आपल्याला जे पटते, जसे वाटते ते सत्य आहे, याची खात्री आपल्याला पटू लागते. वैचारिक ऊर्जा ही शेवटी याच सत्यावर आधारित असते. सत्य हे शेवटी इतरांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. आतून येणारा आपला आवाज जेव्हा आपल्याला मनःपूर्वक सांगतो की, तुमचे बरोबर आहे, तेव्हा ते बरोबरच असणार.