'मोदीहत्येचा कट खोटा' म्हणणाऱ्या पवारांचा घेतला समाचार
'पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नेते नसून ते संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्रावर शंका उपस्थिती करणे हे अत्यंत दुर्दैवी बाब असून आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून पवार इतक्या खालच्या पातळीवर उतरतील असे वाटले नव्हते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काल रात्री पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये पवारांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत, पवारांवर जोरदार टीका त्यांनी केली आहे.
'पंतप्रधान यांच्या हत्येचा कट केल्याविषयी ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्या पूर्णपणे खोट्या असून फक्त जनतेची सहानभूती मिळावी, या उद्देशाने या बातम्या पेरल्या गेल्या आहेत' असे वक्तव्य काल पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान केले होते. पवारांच्या या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच ट्वीट करत पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर संपूर्ण देशाचे नेते असतात. त्यामुळे पवारांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही. असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून पवार इतक्या खालच्या पातळीवर येतील अशी अपेक्षा आम्ही कधीही केली नव्हती. परंतु दुर्दैवाने ते देखील घडले आहे. परंतु पोलिसांकडे या सर्व गोष्टींचे पुरावे असून सत्य काय आहे ? हे लवकरच बाहेर येईल, असे देखील मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे.