सगळे विरोधक एकत्र आले तर आव्हान निर्माण होईल, हे खरेच, पण ‘विरोधक’ म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तरच कुणापाशी नाही. आपापल्या मैदानावर सपशेल हरलेले हे लोक स्वत:ला ‘लढवय्ये’ समजत असले तरी लढाईत रणगाडे लागतात, मोट नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे.
‘बिरबलाची खिचडी’ आणि ‘मनातले मांडे’ हे वाक्प्रचार मराठीला नवीन नाही. म्हणी आणि वाक्प्रचारांची गंमत अशी की, जसजसे प्रसंग घडायला लागतात, तसतसे ते आठवायला लागतात. कर्नाटकात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहाता या दोन्ही वाक्प्रचारांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. भाजप विश्वासदर्शक ठराव जिंकू न शकल्याने देवेगौडांचे सुपुत्र कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. सभांना गर्दी आणि त्याचे रोख प्रतिबिंब विधानसभेच्या जागांमध्ये पडण्याची जी काही कला नरेंद्र मोदींनी गेल्या पाच-सहा वर्षांत आत्मसात केली आहे, त्याचा तोड अद्याप काही विरोधकांना सापडलेला नाही. आपल्याकडे सभेला गर्दी खेचणारे राज ठाकरे वगैरे लोक आहेत, पण ते फक्त मनोरंजनाचे विदूषक. लोक त्यांना निवडून वगैरे देत नाहीत. काँग्रेसला आता जमली तर ही खिचडी शिजवायची आहे आणि मोदींचा ज्यांना त्रास होतोय, अशा सगळ्या लिबरल बिरबलांनी मनातल्या मनात मांडे खायला सुरुवात केली आहे. कर्नाटकात सात-आठ जागांच्या फरकामुळे जे झाले ते संपूर्ण देशात घडेल, अशी यांची अपेक्षा आहे. पंजाब वगळता आता एकही मोठे राज्य हातात राहिलेले नसलेल्या एकेकाळच्या बलाढ्य काँग्रेसने प्रादेशिक पक्षाच्या काड्यांचा आधार घेऊन आपण बुडणार नाही, असा समज करून घेतला आहे. मायावती आणि आपण शाळेतल्या मैत्रिणी असल्यासारख्या सोनिया गांधी काल वागत होत्या, त्या यामुळेच. बरं प्रसंग काय? यांचा त्याच्याशी संबंध काय? यांना लोकांनी नाकारले आहे, अशा कुठल्याही गोष्टींचे तारतम्य न ठेवता ही मंडळी एकत्र आली होती. कुमारस्वामी म्हणजे मायावतीला झाकावे आणि कुमारस्वामींना काढावे, अशी त्यांची राजकीय प्रतिमा. ज्यांचा पाठिंबा घ्यायचा, त्यालाच नाकदुर्या काढायला लावायच्या आणि नंतर वार्यावर सोडून द्यायचे, असा त्यांचा खाक्या राहिला आहे.
2014 पूर्वीच्या भाजपनेही त्यांच्यासोबत हात पोळून घेतले आहे. सत्ता स्थापन करीत असताना ती पाच वर्षे चालावी व सत्तेच्या सोन्याच्या ताटावर आपल्यालाच पाच वर्षे बसायला मिळावे, असे नवे ठाकरी विचार तिथेही आहेतच. मात्र, राजकीय वास्तव काही निराळेच असते. कुरघोडी, सत्तासंघर्ष व त्यातून निर्माण होणारा सत्तासंघर्ष, हाच या सगळ्याचा पाया होऊन बसतो. कुठलाही राष्ट्रीय बाणा व वैचारिक अधिष्ठान नसलेल्यांबरोबर काम करण्यातली हीच मोठी अडचण असते. बाळासाहेब ठाकरे असताना किमान शिवसेनेबाबत हा प्रश्न नव्हता, पण उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मात्र नवी ठाकरी शैली विकसित केली आहे. कुमारस्वामींच्या राज्याभिषेकाला जे जमा झाले होते, ते सगळे असेच लोकांनी ओवाळून टाकलेले लोक आहेत. ममता बॅनर्जी वगळल्या तर उरलेल्या कुणाकडेही स्वत:चे राज्य नाही. किटकनाशकांचा फवारा उडाल्यावर झुरळे इकडे तिकडे पळायला लागतात, तशीच ही मंडळी आहेत. यात लालूंचे चिरंजीव आहेत. बारामतीकर शरद पवार आहेत. अजित सिंग आहेत, उत्तर प्रदेशातल्या रस्त्यावर ‘मिग’ लढाऊ विमान उतरवूनही पराभूत झालेले मुलायमसिंहांचे चिरंजीव अखिलेशही आहेत. डाव्यांचे राजकारण न चालल्याने पाठिंबा द्यायला धावत गेलेले सीताराम येचुरीदेखील आहेत. कोेट्यवधींची ‘माया’ जमा केलेल्या धनदांडग्यांना जेवढा नोटाबंदीचा त्रास झाला नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास या मंडळींना मोदींचा झाला आहे आणि केवळ मोदी हटविण्यासाठीच ही मंडळी आज आपापसातले वैर विसरून एकमेकांचे हात धरून उभी राहिली आहेत. असे एकमेकांचे हात धरून उभे राहणे ठीक आहे, पण एका ठराविक काळानंतर सगळ्यांना या ताटकळण्याचा त्रास व्हायला लागतो आणि सुंदोपसुंदी सुरू व्हायला लागतात. या विळ्याभोपळ्यांच्या बांधल्या जाण्याची आज ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. मात्र, अशा गमज्यांना कंटाळूनच लोक मोदींना मतदान करतात, हे ही मंडळी विसरली आहेत. आजच्या सर्वच वर्तमानपत्रांत या सगळ्यांचे हात वर करून स्मितहास्य करतानाचे फोटो आलेले असले, तरीही ही सगळीच मंडळी स्वत:च्याच विनाशाकडे निघालेली आहेत. सत्तरीच्या दशकात इंदिरा गांधींच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिले होते. सत्तेवर आल्यापासूनच जनता पक्षाच्या लोकांनी आपापसात भांडायला सुरुवात केली होती. चरणसिंगांनी तर वेळ पडल्यास स्वत:चे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी इंदिरा गांधींशी संधान बांधण्याचा मार्गही खुला ठेवला होता. धूर्त इंदिरा गांधींनी या सगळ्या बिघडलेल्या वातावरणाचा पूर्ण फायदा घेतला आणि पुन्हा नव्या जोमाने सिंहासनावर आरुढ झाल्या. इतकेच नाही तर जनता पक्षाच्या मंडळींनी परस्परांमध्ये जे अविश्वासाचे वातावरण निर्माण केले होते, त्याचा उपयोग करून आणीबाणीतल्या कितीतरी प्रकरणांमध्ये स्वत: विरुद्ध कारवाईही होऊ दिली नाही. कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी जे सगळे महाभाग एकत्र आले होते, त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही ती म्हणजे, ठिगळ लावलेली ही गोधडी जितक्या वेळा जनतेसमोर पेश केली जाईल, तितकाच लोकांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास पक्का होत जाईल. भाजपविरोधात सगळे एकवटले तर भाजपला जड जाईल, ही जी काही हवा आता निर्माण केली जात आहे, तीही अशीच पोकळ आहे. सगळे विरोधक एकत्र आले तर आव्हान निर्माण होईल, हे खरेच. पण, ‘विरोधक म्हणजे कोण?’ या प्रश्नाचे उत्तरच कुणापाशी नाही. आपापल्या मैदानावर सपशेल हरलेले हे लोक स्वत:ला ‘लढवय्ये’ समजत असले तरी लढाईत रणगाडे लागतात, मोट नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे.