मुंबई, तीन आठवडे मुंबई सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ, सभात्याग, आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारी या आणि अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष चर्चेत राहिले. आता हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. ८ डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच राज्यपालांनी दिलेल्या संदेशानुसार पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा सांगताना ते म्हणाले, या काळात एकूण १५ बैठका झाल्या आणि एकूण १३३ तास ४८ मिनिटे कामकाज झाले, तर ४५ मिनिटांचा वेळ वाया गेला.
यात दिवसाचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. यामध्ये १५२ लक्षवेधी आणि ९२ तारांकीत प्रश्नांवर चर्चा झाली. विधानसभेत १४ शासकीय विधेयके सादर झाली. १५ विधेयकांवर सहमती झाली, तर एक मागे घेण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली.