मुंबई : “केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे सत्य जगभर पोहोचेल. युद्धातील वास्तव जगासमोर मांडले जाईल आणि पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक देश असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. हे प्रभावी ‘कूटनीती’चे (डिप्लोमसी) उत्तम उदाहरण आहे. भारताच्या भूमिका जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. १७ एप्रिल रोजी दिली.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबाराविषयी विचारले असता ते म्हणाले, “जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी मी दर महिन्याला नागपूरमध्ये जनता भेटीचा कार्यक्रम घेतो. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवल्या जातात. या कार्यक्रमात आलेल्या तक्रारी विभागांकडे पाठवून त्याचा नियमित फॉलोअप घेतला जातो. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास अधिक दृढ झाला आहे. आपले प्रश्न येथे मांडल्यास ते नक्कीच सोडवले जातील, असा विश्वास लोकांना वाटतो आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.