मुंबई : मशिदी, प्रार्थनास्थळांतील मुल्ला मौलवींना लाखों रुपये वाटून उद्धव ठाकरेंनी मतं मिळवली, असा गंभीर आरोप ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच ठाकरेंची ही भूमिका मान्य नसल्याने दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, "काही विशिष्ट समाजाला जवळ करत मशिदी आणि प्रार्थनास्थळांतील मुल्ला मौलवींना लाखों रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि उबाठा गटाने आपल्याकडे मतं पाडून घेतली. ते मतदार शिवसेनेचे कधीच नव्हते. ठाकरे शिवसनेच्या विचारापासून फारकत घेऊन मतं मिळवण्यात यशस्वी झालेत. याशिवाय संविधान बदलणार हा एक गैरसमजही पसरवण्यात आल्यामुळे केवळ ३ ते ४ जागांचा फायदा उबाठा गटाला झाला आहे. पण आता लोकांच्या हे लक्षात येतं आहे."
"त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं त्यांच्यात आता पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे. आमदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिल्लक आमदार, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहाताहेत. ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संपर्क साधून निर्णय घेणार आहे. उबाठा गटाच्या निवडून आलेल्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे," असा दावाही त्यांनी केला आहे.