नागपूर: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हनी ट्रॅप प्रकरणात विरोधकांकडे काही ठोस माहिती असती, तर ती त्यांनी माध्यमांसमोर किंवा थेट विधानसभेत मांडली असती.पण त्यांच्या हाती काहीच नाही. ते केवळ संभ्रमित करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांना जे सांगितलं जाते, ते तसे बोलतात. ते विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांच्या बाजूनेच दिसतात. जनतेला संभ्रमित करून स्वतःचा टीआरपी वाढवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सभागृहात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तुमच्याकडे काही पुरावे असतील, तर ते समोर आणावेत.त्यांच्याकडे खरोखर काही असतं, तर त्यांनी एका सेकंदात जनतेसमोर आणले असते. मात्र हे लोक तसे काही करीत नाहीत, कारण त्यांच्या हातात काही पुरावे नसल्याचे बावनकुळे म्हणाले. छावा पदाधिकार-यांवर हल्लाबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,राज्यात कोणीही रस्त्यावरची लढाई लढू नये, मग ते अजितदादांचे कार्यकर्ते असोत वा छावा संघटनेचे. ही लढाई वैचारिक असली पाहिजे, रस्त्यावरील नव्हे. स्वतःचे‘मार्केटिंग’ करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणे, एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून निर्णय होणार नाहीत.
विकसित महाराष्ट्रासाठी अशा तंट्यांना स्थान नाही.आपसातील राड्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये. आंदोलनाचे स्वरूप मारहाणीचे नसून वैचारिक असले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. कळमना बाजारची चौकशी करण्याबाबत आमदारांनी मागणी केली होती. कळमना बाजारात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. एसआयटीने आपली कारवाई सुरु केली. जे काही तिथे ॲाडीट होणार आहे. त्यावर कायद्यानुसार कारवाई होईल असेही बावनकुळे म्हणाले.