पूरस्थिती निर्माण होण्याची मिळणार पूर्वसूचना; विभागीय आयुक्तांना निर्देश

    11-Jun-2024
Total Views |

Ajit Pawar
 
मुंबई :“यंदा पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणे, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे, अशा काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पूर्वसूचना देऊन नागरिकांना सतर्क करावे. वेळेवर मदत व पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. 10 जून रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले.
 
अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीककर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त उपस्थित होते.
 
“हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांअभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकर्‍यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करावा. प्रत्येक पात्र शेतकर्‍याला पीककर्ज मिळण्याची दक्षता घ्यावी,” असे निर्देश पवार यांनी दिले.
पाण्याच्या विसर्गाबाबत काटेकोर नियोजन करा
“हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्यवेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी,” असे निर्देशही अजित पवार यांनी दिले.