नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघामधून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी – वाड्रादेखील यावेळी उपस्थित होत्या. या रोड शोमध्ये जवळपास हजारो लोक सहभागी झाले होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी जनतेस संबोधित केले. ते म्हणाले, ही निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या लढ्यासाठी आहे. एका बाजूला काही शक्ती आहेत ज्यांना देशाची लोकशाही आणि संविधान नष्ट करायचे आहे. दुसरीकडे एक शक्ती आहे जी देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणास मत द्यावे, हे जनतेने ठरवावे असेही राहुल गांधी म्हणाले.दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ केला. दिल्लीमध्ये उत्तर – पूर्व भागात खर्गे यांनी पक्षाच्या पाच गॅरंटीच्या पत्रकांचे वाटप केले. याद्वारे इंडीया आघाडीची भूमिका मांडणार असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
वायनाडमध्ये तिरंगी लढत
राहुल गांधी २०१९ साली वायनाडमधून चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. वायनाडमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) अॅनी राजा, काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपचे के. सुरेंद्रन निवडणुकीच्या रिगणात आहेत.