मुंबई : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी रामानंदी पंथाच्या प्राचीन पाताळपुरी मठात १५१ मुस्लिम महिला व पुरुषांनी गुरुदीक्षा घेतली. वाराणसी येथे यासंबंधीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा पातालपुरी मठातील जगद्गुरू बालकदास महाराज यांच्याकडून ही गुरुदीक्षा घेण्यात आली. अशी माहिती आहे की, दरवर्षी काही मुस्लिम बांधव येथे येतात आणि गुरुदीक्षा घेतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, गुरुपौर्णिमा हा गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे. यामुळे गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अधिक दृढ होते.
ते म्हणतात, दीक्षा घेणे आणि तुमच्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे, लोककल्याण करणे, देशासाठी जगणे, कौटुंबिक ऐक्य राखण्यासाठी त्याग करणे, सर्व लोकांचा आदर करणे हीच खरी गुरुदीक्षा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गुरुशिवाय यश मिळवणे शक्य नाही.
यावेळी उपस्थित शहाबुद्दीन तिवारी म्हणाले की, आमचे पूर्वज रामपंथी होते आणि या मठाचे अनुयायी होते. आपली उपासना करण्याची पद्धत बदलली असली तरी आपले पूर्वज, परंपरा, संस्कृती या गोष्टी बदलू शकत नाही. मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नाझनीन अन्सारी म्हणाल्या की, रामाच्या मार्गाचे अनुसरण करूनच जगात शांती येऊ शकते. गुरुशिवाय रामापर्यंत पोहोचता येत नाही. फक्त गुरुच आपल्याला अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतो.