ई-वेस्ट अर्थात ई-कचर्याचे पर्यावरणावर होणारे अनेक परिणाम आपण अनुभवत आहोतच. पण, याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून निर्माण होणार्या कचर्यापासून आरोग्य विषयी अनेक गंभीर समस्या ओढवत आहेत, त्यांचा आढावा घेत सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टीने लिहिलेला हा लेख...
ई-वेस्टमध्ये असणार्या विषारी द्रव्यांचा परिणाम स्त्रिया आणि मुले यांवर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ई-वेस्टपासून ही मंडळी अधिक असुरक्षित असतात. बरेच जण या कचर्याची विल्हेवाट बेकायदेशीरपणे ठरावीक आणि सुरक्षित जागेत न करता, त्याचा औद्योगिक व्यवस्थेत वापर न करता आणि बर्याचदा सुरक्षा उपायांशिवाय कसाही आणि कुठेही ई-कचरा फेकतात. अनौपचारिक पद्धतीने पुनर्चक्रीकरणाचे काम करणारे कामगार ई-वेस्टपासून घातक पदार्थ बाहेर काढण्याचे काम करत असतात. त्यामुळे, त्यांच्या आरोग्यावरही हानिकारक परिणाम होऊ शकतात. त्यातील बरेच अडाणी, निरक्षर असे असल्याने त्यांना ई-वेस्टपासून होणारा धोक्याबद्दल जाणीव नसते.
एकट्या दिल्लीतच जवळजवळ २५ हजार कामगार आणि काही बालमजूरदेखील ई-वेस्ट निवडायच्या कामात सहभागी होतात, अशा पद्धतीच्या ठिकाणी दहा ते वीस हजार किलो ई-वेस्ट उघड्या हाताने हाताळले जाते. यांना विशेष वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देखील उपलब्ध नसतात. त्यामुळे ई-वेस्टमधल्या विषारी द्रव्यांचा त्यांचा थेट संबंध येतो. ई-वेस्टमधील जे पदार्थ काढले जात नाही आणि बाकी राहतात, अशी द्रव्ये, धातू इत्यादी भूमीभरण क्षेत्रात असेच टाकले जातात किंवा त्यांना जाळले जाते. या दोन्ही पद्धतीने ही विषारी रसायने आसपासच्या हवा, पाणी आणि मातीमध्ये मिसळतात. ई-वेस्टमधील विषारी द्रव्ये त्वचेशी थेट संपर्क, शिवाय श्वासाबरोबर नाकावाटे सूक्ष्मकण शरीरात जातात आणि कधीकधी अन्नावाटे गिळलेदेखील जातात. या विषारी द्रव्यांचे परिणाम पुढील प्रकारे होतात. थायरॉईडचे कार्य बदलले जाते. फुप्फुसांवर वाईट परिणाम होतो. गरोदर स्त्रियांच्या गर्भावर यांचा परिणाम होतो, कधी कधी अकस्मात गर्भपातदेखील होतो. जन्मतः मृत बालके, मुदतीच्या आधीच होणारी प्रसूती, अशा बाबी मातांच्या बाबतीत संभवतात. ‘डीएनए’रेणूंवर थेट परिणाम होऊन ‘डीएनए’मध्ये त्रुटी येतात. लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांनादेखील ई-वेस्टमुळे आरोग्य समस्या होऊ शकतात.
भारतात 10 ते 15 या वयोगटातील, चार ते पाच लाख बाल कामगार ई-वेस्ट पुनर्चक्रीकरणाच्या कामात आढळून आलेले आहेत. त्या बालकांच्या वाढीवर ई-वेस्टमधील रसायनांचा नकारात्मकपरिणाम दिसून आला आहे आणि त्यापैकी काही मुलांना कायमस्वरूपी हानिकारक आरोग्य समस्या झालेल्या आहेत. यातील शिसे मुलांसाठी फारच घातक आहे. ई-वेस्टच्या कामात असणार्या मुलांच्या रक्तामध्ये शिश्याचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आढळून आले. याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर आणि बुद्धिमत्तेवरदेखील होतो. आपण सहज म्हणून कचर्याच्या बादलीत संपलेले सेल्स टाकतो, पण त्यातील शिसे कोणाचीतरी हानी करू शकते हे लक्षात कधी घेणार?
- डॉ. नंदिनी देशमुख