शरीरप्रकृती आणि रोगप्रवण स्थिती भाग-३२

    14-Mar-2023
Total Views |
Physiology and Predisposing Conditions Part-32


मंद जठराग्नीमुळे शरीराचे व मनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मंद जठराग्नी व वातप्रकोप या कारणामुळे शरीरात म्हणजेच विष उत्पन्न होते व शरीरातील सांधे व हाडांवर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यालाच आपण ‘आमवात’ असे म्हणतो.आता हा आमवात मंदाग्नीमुळे कसा होतो? तर अतिखाण्यामुळे, तसेच जेवणानंतर मध्ये-मध्ये उगीच काहीतरी खात राहणे (फळे खाल्ली तर चालतात.)

 
मेंदूकडून शरीराला नेहमी एक संदेश पाठवला जातो, जेणेकरून आपल्याला भूक लागल्याची भावना होते. जेव्हा भूक लागते, त्याच वेळी जेवण जेवणे, ही एक चांगली सवय आहे. निरोगी सवय आहे. परंतु, भूक लागलेली नसतानाही सतत काहीतरी खात राहण्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो व त्यामुळे ‘टॉक्सिन्स’ तयार होतात.जेव्हा जेवताना अतिप्रमाणात फळांचा रस किंवा सतत पाणी पित राहिले, तर अशावेळी जठराग्नी मंदावतोे व अपचन होते.कुठल्याही वेळी थंडगार पदार्थ किंवा पेय पिणे. त्यामुळेही जठराग्नी मंदावतो व ‘टॉक्सिन्स’ तयार होतात.

ज्यावेळी एखाद्याला बद्धकोष्ठता असेल, तरीही जर पोटभर खाणे खाल्ले, तर अशावेळी पचन संस्थेवर ताण पडतो व अन्नाचे पचन नीट होत नाही व आम तयार होतो. मानसिकतेचाही या ‘आम’ (टॉक्सिन्स) तयार होण्यावर परिणाम होत असतो.जर एखादा माणूस भावनिकदृष्ट्या त्रासलेला किंवा बेचैन असेल आणि त्याने भावनिक असमतोल असताना भरपूर प्रमाणात भोजन केले, तर अशावेळी शरीरातील आम्ल व इतर पाचक द्रव्ये बरोबर स्रवत नाहीत व त्यामुळे अन्नाचे पचन होत नाही. उदाहरणार्थ - ज्या लोकांंना उदासीनता, डिप्रेशन किंवा काही मानसिक आजार असतात, अशी लोक या स्थितीत अतिप्रमाणात अन्नाचे सेवन करतात, असे लक्षात आले आहे. आणि अशा अतिप्रमाणात खाण्याने स्थूलता येते, अशा लोकांना आमवात होण्याचेही प्रमाण जास्त असते.
 
जेवणाचीसुद्धा एक विशिष्ट वेळ असावी, केव्हाही कधीही खाऊ नये. त्यामुळे शरीराचे आतील घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) बिघडते व त्यामुळे शरीरात आमवात तयार होतो.साधारणपणे सकाळी ७च्या आधी भोजन करू नये व तसेच संध्याकाळीसुद्धा फार लवकर लवकर जेऊ नये.शिळे अन्न खाऊ नये. त्यामुळे शरीरात आम तयार होत असतो.उभे राहून जेवू नये. स्वस्थपणे एका जागी बसून जेवावे. म्हणूनच आपल्याकडे बसून जेवण्याची पद्धत आहे. सुखासनात बसून भोजन केले, तर ते सर्वात चांगले मानले जाते.हल्ली ज्याला आपण ‘जंकफूड’ म्हणतो म्हणजेच मैद्याचे पदार्थ, तसेच पिझ्झा, बर्गर, सॅण्डविच, तसेच हॉटेलमधील पदार्थ यांचे अतिप्रमाणात सेवन करू नये. त्यानेसुद्धा जठराग्नी मंदावतो व शरीरात ‘टॉक्सिन्स’ तयार होतात.
 

-डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.