परोपकारी बांडगुळ जळू

    19-Feb-2023
Total Views |
leech

आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा एकेकाळची ‘सोकॉल्ड’ गावठी ‘लीच थेरपी’ वापरली जाते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हिरूडो जातीच्या जळवा वापरल्या जातात. पूर्वी आदिवासी लोकं या विशिष्ट जातीच्या जळवा डॉक्टरांना आणून द्यायचे. आधुनिक काळात या जळवा बायोफार्म ‘लीच’ किंवा तत्सम कंपनीद्वारे पुरवल्या जातात. याच जळवांची माहिती देणारा हा लेख...

मंडळी, माणसाने अवाढव्य हत्तीपासून महासूक्ष्म अशा विषाणूपर्यंत कितीतरी जीवांना स्वत:च्या सेवेत राबायला ठेवलेलं आहे. त्यांना प्रशिक्षण देता आलं तर तसं नाहीतर मग त्यांच्या जशा नैसर्गिक सवयी आहेत तसंच. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार ‘आरोग्य सलामत तर उद्योग हजार’ करता येतात. म्हणून या क्षेत्रासाठी उपयुक्त असे निसर्गातले अनेक घटक काळजीपूर्वक निवडून समाविष्ट केले गेले. त्यांच्यापैकी एक आहे जळू. वास्तविक पाहता सदैव ओलसर जागी किंवा पाण्यात राहणार्‍या या प्राण्याला इतकं विरोधाभास असलेलं नाव आपल्या मराठीत का मिळावं, या गंमतीशीर प्रश्नाचं उत्तर पुढे मिळणार आहे. आपल्याकडे कोरड्या दिवसांत सुप्तावस्थेत असणारी आणि पावसाळ्यात सक्रिय होणारी जळू फार प्राचीन काळापासून वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मोलाचे स्थान मिळवून आहे. दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजनाचा दिवस.

डॉक्टरांच्या या देवाच्या उजव्या हातात ’जलौका’ म्हणजे जळू असते. तिच्या रक्त पिण्याच्या गुणधर्मामुळे, गळू किंवा रक्त साकळलेल्या भागावर जळू लावून तेथील दूषित रक्त काढून टाकण्याच्या कामावर तिला नेमलं जायचं आणि अजूनही जातं. या पद्धतीला ‘रक्तमोक्षण’ असं नाव आहे. आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्याकडे बरणीतल्या पाण्यातल्या जळवा पाहत बसणं हा माझा बालपणापासूनचा आवडता उद्योग आहे. शरीरोपचारांमध्ये जळूच्या वापराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. फक्त आपल्याच देशात नाही तर जगभर अनेक देशांमध्ये. आपल्या देशात पूर्वी तर न्हावीसुद्धा जळवा लावून नासकं रक्त काढून द्यायचे. याला ’तुंबडी लावणे’ असं म्हणतात. ’रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी’ या म्हणीचा उगम इथे आहे. आता तर आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धाही एकेकाळची ‘सोकॉल्ड’ गावठी ’लीच थेरपी’ वापरली जाते. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हिरूडो जातीच्या जळवा वापरल्या जातात. पूर्वी आदिवासी लोकं या विशिष्ट जातीच्या जळवा डॉक्टरांना आणून द्यायचे.

आधुनिक काळात या जळवा ‘बायोफार्म लीच’ किंवा तत्सम कंपनीद्वारे पुरवल्या जातात. त्यांच्या वापरामुळे रूग्णाला कुठल्याही प्रकारचा संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे प्रजनन वैद्यकीय प्रयोगशाळेतल्या निर्जंतुक आणि मानवी वापरासाठी सुरक्षित अशा वातावरणात केलं जातं.तर अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या परिचयाची असलेली ही जळू, ’हर्माफ्रोडाईट’ म्हणजे अर्धनारीनटेश्वर या प्रकारात येते. गोगलगाई, गांडूळं, स्लग्स हेसुद्धा याच वर्गातले सदस्य.जळूचं वर्गीकरण दोन प्रकारात केलं जातं. र्‍हिकोडेलीडा (Rhynchobdellida) आणि अर्‍हिकोडेलीडा (Arhynchobdellida). . rhynchus - चोच & bdella - जळू ’र्‍हिकोडेलीडा’ प्रकारातल्या जळवांना तोंडामध्ये लवचिक सुईसारखा अवयव असतो, ज्याच्याद्वारे त्या रक्त शोषून घेतात. ‘अर्‍हिकोडेलीडा’ या प्रकारातल्या जळवांच्या तोंडात पात्यासारखे ‘ध’ आकारात तीन धारदार अवयव असतात ज्यांचा वापर करून त्या त्वचेला छेद देतात आणि रक्त शोषून घेतात. या प्रकारातल्या जळवांनी रक्त शोषायच्या जागी सोडल्यावर तिथे मर्सिडीजच्या चिन्हासारखी ध आकाराची तीनधारी जखम दिसते. जळूच्या शरीराच्या दोन्ही टोकांना दातेरी अवयव असतात ज्याचा उपयोग तिला ‘होस्ट’च्या(रुग्णाच्या) शरीरावर स्वतःला अँकर करण्यासाठी होतो.


leech

 एकदा का शेपटीच्या दाताने स्वतःला ‘होस्ट’च्या त्वचेवर अँकर केलं की जळू तोंडाच्या भागाने त्वचेला छेद देते व हिरूडीन नावाचे रसायन जखमेत सोडते, ज्यामुळे खपली धरण्याची प्रक्रिया होत नाही व रक्त प्रवाही राहतं. इवलीशी जळू सुमारे अर्धा तास रक्त प्यायल्यानंतर चांगली दसपट मोठी होते व आपोआप गळून पडते. (त्वचेवर चिकटलेली जळू काढून टाकण्यासाठी मीठ किंवा डेटॉलचा उपाय करून पाहावा). हिरूडीनचा प्रभाव कमी झाला की, जखमेवर खपली धरण्याची प्रक्रिया परत सुरू होते. जळूच्या विविध जातींनुसार जखमेच्या ठिकाणी ‘रिअ‍ॅक्शन’ येणार की नाही येणार, हे ठरतं. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार एक-दोन दिवस किंवा फारतर आठवडाभर जळू चावलेल्या ठिकाणी कंड सुटत राहते व नंतर थांबते. पण काही जणांमध्ये या काळात तेथील त्वचा जरा खराब झाल्यासारखी दिसू शकते. यानंतर जळू अनेक महिने हे रक्त पचवत राहते.

अन्न न मिळाल्यास ती वर्षभरसुद्धा उपाशी राहू शकते. जळवा मिलनकाळात एकमेकींच्या शरीरात शुक्राणू सोडून एकमेकींच्या शरीरातील अंड्यांना फलित करतात. यानंतर जळू त्वचेचाच एक कोष (क्लिटेलम) बनवून त्यात अंडी घालते व त्याला ओलसर दगडाला किंवा खोडाला चिकटवून देते. काही आठवड्यांनी कोषातून पिल्लं बाहेर येतात व प्रौढांप्रमाणेच रक्तपिती होतात. जळूला गोगलगायीप्रमाणे सक्रिय राहण्यासाठी ओलाव्याची आवश्यकता असते. म्हणून पावसाळ्यात जळवा सर्वात जास्त आढळतात. पावसाळ्यात कोयनेच्या जंगलात हिंडताना फांद्याफांद्यांवरून अंगावर झेपावणार्‍या जळवा आठवल्या की, माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. फारसं दिसत नसलं तरी प्राण्याच्या शरीरातली उष्णता आणि गंध यांचं गणित जुळवून जळू शरीराला चिकटते.

आम्ही तर बेडकांच्या अंगावरही जळवा लागलेल्या पाहिल्या आहेत. जळू रक्तपिपासू असली, तरी पाण्यात राहणार्‍या काही जळवा गोगलगायी, गांडूळं व कीटकांच्या पिल्लांना खातात. जळवांचे मुख्य शत्रू म्हणजे कासव, पक्षी, मासे इ. जे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. आपल्या सह्याद्रीततले आदिवासी बांधव उन्हाळ्यातला अन्नाचा स्रोत म्हणून दर्‍याखोर्‍यातल्या धोंड्यांवर दगड भरडून त्याखालच्या बिळात लपलेले खेकडे गोळा करतात. या खेकड्यांच्या आतल्या ओलसर भागात अनेकदा जळवा आढळतात, ज्या उन्हाळ्यात ओलाव्याचा स्रोत म्हणून पावसाळा संपल्यावर खेकड्यांच्या शरीरात शिरून खेकड्याला इजा न करता सुप्तावस्थेत गेलेल्या असतात.जळू हा प्राणी एकंदरच जरा विचित्र आहे. पण तरी तिला पाहिल्यावर ’अशी ही बनवाबनवी’मधल्या ’विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत’ या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही, हेही तितकंच खरं....!

 
-मकरंद केतकर



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121