नवी दिल्ली : रेल्वेने लॉकडाऊनमध्ये गाड्यांच्या कमी झालेल्या फेऱ्यांचा फायदा घेत अतिमहत्वाचे एकूण दोनशे प्रकल्प पूर्ण केले आहेत. कित्येक वर्षे या प्रकल्पांवर काम सुरू होते. मात्र, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमुळे कामाला गती येत नव्हती तसेच खर्चही वाढत होता. लॉकडाऊनच्या काळात संधी मिळताच हे सर्व प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने पूर्ण केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबद्दल परिपत्रक काढत माहिती दिली.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला रेल्वे संपूर्णपणे ठप्प होती. या काळात कुठलीही विशेष ट्रेनही धावत नव्हती. याच काळात हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. जुने पूल पूर्ण करण्याची योजना, दुरुस्ती, यार्डाची पूर्नरचना, रेल्वे रुळांचा विस्तार, विद्युतीकरण, क्रोसओव्हर साधन आदी संदर्भात सर्व कामे आता पूर्ण झाली आहेत. रखडलेल्या कामांमुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी मर्यादा येत होत्या. आता नव्याने काम पूर्ण झाल्याने गती वाढणार आहे. मालगाड्यांमधून अत्यावश्यक वस्तूंची ने आण करत असतानाच रेल्वेने याकाळात बऱ्याच योजना पूर्ण केल्या.
लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने प्रलंबित प्रकल्पांवर काम केले. अशी कार्ये ज्यामुळे गाड्या रद्द कराव्या लागत होत्या किंवा मार्ग बदलावे लागत होते. हीच कार्ये प्रामुख्याने समोर ठेवली. यातील काही प्रकल्पांमुळे रेल्वेला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत होता. लॉकडाऊनला संधी मानत रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत ही कामे पूर्णत्वःस नेली.
या काळात ८२ पूलांची दुरुस्ती, लेव्हल क्रॉसिंग फाटकाच्या जागी ४८ कमी उंचीचे सबवे, भूमार्ग, १६ फुटी ओव्हर ब्रिजची निर्मिती करण्यात आली. १४ जीर्ण पूल पाडण्यात आले. ७ रोड ओव्हर ब्रिज सुरू करण्यात आले. पाच यार्डांचे पूर्नरचना एका मार्गाचे दुपदरीरकरण तसेच विद्युतीकरण करण्यात आले. तसेच अन्य २६ योजनांचा सामावेश आहे.