नवी दिल्ली: “आम्ही जातीचे राजकारण करत नाही, तर वंचित, पीडित, शोषित आणि वगळण्यात आलेल्यांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करतो. ही समाजाची गरज आहे. आम्ही हे जातीनिहाय जनगणनेतून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ साधणार आहोत. या बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असे केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) रविवार, दि. 25 मे रोजी दिल्लीत पुन्हा एकदा एकता दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांसह 20 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
‘पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर म्हटले होते की, ते सैन्याचे शौर्य आहे. आपल्याला स्वावलंबी भारत निर्माण करायचा आहे, यावरही त्यांनी भर दिला आहे,” असेही जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेवरील निर्णायक कारवाईचे कौतुक, सामाजिक न्यायासाठी जातीय जनगणनेच्या समर्थनार्थ प्रस्ताव आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत व्यापक चर्चा या बैठकीत झाली. यासोबतच, बिहार विधानसभा निवडणुकीबाबत ‘एनडीए’च्या राजकीय रणनीतीचे संकेतही दिल्याचे समजते.
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले की, “उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीत ‘यूसीसी’बद्दल सांगितले. तसेच, आतापर्यंत कोणती पावले उचलली गेली आहेत ते सांगितले. तसेच, आपली अनेक राज्यांनी त्या राज्यांशी चर्चा केली. सम्राट चौधरी यांनी छत्तीसगढमधील बस्तरमधील नक्षलवादाबद्दल भाष्य केले, तर हेमंत बिस्वा सरमा यांनी बालविवाहांच्या प्रश्नासह ते विवाह थांबवण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलंकार प्रकल्पाबद्दल सांगितले असून, ज्यामध्ये सरकारी शाळा आणि महाविद्यालये समाविष्ट आहेत. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.”
एकनाथ शिंदे यांनी मांडला अभिनंदन प्रस्ताव
बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जातीनिहाय जनगणनेबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्यात आला. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तसेच, शिंदे यांनी सांगितले की, “जो कोणी आमच्याशी संघर्ष करेल तो धुळीला मिळेल,’ हे आम्ही सिद्ध केले आहे. ही फक्त एक म्हण नाही, तर सत्य आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने सामान्य भारतीयांना नवा आत्मविश्वास आणि स्वाभिमान दिला आहे. केंद्र सरकारच्या धोरणाला, लष्कराच्या शौर्याला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसाला आम्ही सलाम करतो.”
‘एनडीए’ सरकारची अढळ वचनबद्धता अधोरेखित
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मोदींनी तीन दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहत आहे.’ पंतप्रधान मोदी यांचा देशातील 140 कोटी लोकांना अभिमान आहे. या महत्त्वाच्या काळात पंतप्रधान मोदींनी दाखवलेल्या अद्वितीय आणि धाडसी नेतृत्वाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांनी नेहमीच आपल्या संरक्षणदलांना, विशेषतः अशा गंभीर सुरक्षा आव्हानांवर मात करण्यासाठी सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारताच्या शांततापूर्ण विकास प्रवासाला वादात टाकण्याची चूक करणार्यांना योग्य उत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ इतिहास लक्षात ठेवेल. यातून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि भारतीयांच्या सुरक्षेला इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ मानण्याची ‘एनडीए’ सरकारची अढळ वचनबद्धता अधोरेखित होते,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.