विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उबाठा गटाचा दावा! काय म्हणाले संजय राऊत?
01-Mar-2025
Total Views | 45
मुंबई : लवकरच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी चाचपणी सुरु झाली आहे. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उबाठा गट दावा सांगणार असल्याची माहिती खुद्द संजय राऊतांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला दावा मांडणार आहे. आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी नियमात आणि घटनेत असे कुठेच लिहिलेले नाही की, विरोधी पक्षनेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेकडे २० चे संख्याबळ आहे याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही अनेकदा विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. आमची एकत्रित संख्या ५० च्या वर आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष विरोधीपक्षनेतेपदाची आमची भूमिका मान्य करतील," असे ते म्हणाले.
येत्या ३ मार्चपासून मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर दुसरीकडे, पुरेसे संख्याबळ नसतानाही उबाठा गटाकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यासाठी धडपड सुरु आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या तीन नावांची चर्चा आहे.