समस्यांना तोंड देण्यासाठी हिंदूंची तत्परता महत्त्वाची!
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
17-Feb-2025
Total Views | 55
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohanji Bhagwat West Bengal) विश्वाची विविधता स्वीकारून हिंदू पुढे चालत असतो. आपल्याला अशाच हिंदू समाजाला संघटित करायचे आहे. काळ कितीही चांगला असला तरी अडचणी येतात, छोट्या समस्या नेहमीच असतात. समस्या काय आहे हे महत्त्वाचे नाही, समस्यांना तोंड देण्यासाठी समाज किती तयार आहे, हे महत्त्वाचे आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. रविवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या बर्धमान येथील साई मैदानावर स्वयंसेवकांच्या झालेल्या एकत्रीकरणाला त्यांनी संबोधित केले.
सरसंघचालक यावेळी म्हणाले, लोकांमध्ये एक सवय आहे की आपण स्वतःचे वर्तुळ तयार करतो आणि इतरांना त्यापासून दूर ठेवतो, पण संघाचे स्वयंसेवक आपले वर्तुळ वाढवत राहतात. संघाचे स्वयंसेवक याचा सराव करतात. हे केवळ विचारांनी होत नाही, ते रोज शाखेत येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात, त्यांना एकत्र काम करावे लागते. त्यामुळे या विचाराला बळ मिळते. संपूर्ण हिंदू समाजात एकत्र काम करणाऱ्या व्यवस्थेचे नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे करत आज संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत."
पुढे ते म्हणाले की, "देशात एक लाख तीस हजारांहून अधिक सेवा प्रकल्प स्वयंसेवक स्वतः समाजाला घेऊन करत आहेत. ते स्वबळावर काम करतायत. हे यशस्वी होण्यासाठी नाही, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी संघ हे करत आहे. संघाला एकच काम करायचे आहे, समाज संघटित करणे आणि समाज घडवणे."