छोट्या छोट्या प्रयत्नांतून शाश्वत विकास गाठणे शक्य होणार! मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
14-Feb-2025
Total Views | 52
मुंबई : सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे यासारख्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून शाश्वत विकास गाठणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या जनजागृतीपर उपक्रमाअंतर्गत १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडन, हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसक, बीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा, इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "केंद्र सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण निवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास मदत होईल. यासोबतच नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. घरात गॅस आणि वीजेचा योग्य पद्धतीने वापर करणे, सौर पॅनल वापरणे, सिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करून शाश्वत विकास गाठू शकतो," असे त्यांनी सांगितले.