नवी दिल्ली : "आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीमध्ये सत्तेत असताना हाउसिंग स्कीमच्या माध्यमातून त्यांनी झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून लाखो रूपये उकळले. त्यांना राहायाला पक्कं घर मिळेल असं खोटं आश्वासन दिलं. परंतु आपच्या नेत्यांनी या गरिबांना फसवलं असून त्यांचे पैसे लुबाडले" असा आरोप भाजपनेते पर्वेश वर्मा यांनी केला आहे. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना पर्वेश वर्मा यांनी दिल्लचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या पर्वेश वर्मा यांनी आप चा अजून एक घोटाळा जगासमोर आणला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आम आदमी पक्षाने सार्वजनिक व्यवस्थापूर्णपणे बिघडवली आहे. दिल्लीमध्ये राहणारे नागरिक विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची केजरीवालांनी दिशाभूल केली आहे. मला केजरीवालांना विचारायचं आहे की गरिबांची घरं उद्धवस्त करून स्वत:साठी शीशमहाल कोण बनवतं आहे ? असा प्रश्न वर्मा यांनी विचारला. केजरीवाल जर का आपलं वचन पूर्ण करू शकत नसतील तर त्यांनी निवडणूक लढवू नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. सदर पत्रकार परिषदेत झोपडपट्टींमध्ये राहणारे अनेक रहिवासी उपस्थित होते. वर्मा यांनी माहिती कायद्यांतर्गत सगळे पुरावे सादर केले. दिल्ली सरकारने झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून पैसे घेतले परंतु वचन दिल्याप्रमाणे फ्लॅट्स दिलेले नाही. आम आदमी पक्षाच्या आख्त्यारीत असलेल्या नगरपालिकाने झोपड्या हटवण्याचे काम केले परंतु योग्य नागरिकांना घरं दिली नाहीत असा आरोप पर्वेश वर्मा यांनी केला.