मनोज जरांगेंनी 'या' गोष्टीचा विचार करायला हवा! मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
10-Sep-2024
Total Views | 219
ठाणे : आम्ही १० टक्के आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याचा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला आम्ही १० टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवलं. पण काही लोकं विरोधात गेलेत. जेव्हा त्यांना आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा त्यांनी दिलं नाही. आता आम्ही १० टक्के आरक्षण दिल्यावर ते रद्द होण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याचासुद्धा मनोज जरांगेंनी विचार करायला हवा," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "कुणबी नोदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचंही काम सुरु आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या बाबतीत आलेले आक्षेपही तपासण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, ही कायम सरकारची भूमिका आहे," असेही ते म्हणाले.