नवी दिल्ली : मोदी सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात गरीब, तरुण, शेतकरी तसेच महिलांची शक्ती मजबूत करण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. या अर्थसंकल्पात या घटकांसाठी अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.
अर्थसंकल्पात नोकऱ्यांमध्ये महिलांचा वाटा वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी वसतिगृह स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात महिलांचा नोकरीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांची घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, "आम्ही उद्योगांच्या सहकार्याने नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी वसतिगृहे बांधून आणि क्रॅच (लहान मुलांसाठी काळजीची ठिकाणे) उभारून महिलांच्या नोकऱ्यांमध्ये अधिकाधिक सहभागाची संधी देऊ."
यासोबतच, अर्थसंकल्पात महिलांसाठी विशिष्ट कौशल्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल आणि महिला स्वयंसहाय्यता गट उपक्रमांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशीही माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने 3 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे.