मुंबई, दि.१३ : प्रतिनिधी "प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते २९ हजार कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. आदरणीय प्रधानमंत्री जी आपला कार्यकाळ हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंडा करता लोक लक्षात ठेवतील, तसंच अतिशय अद्भुतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीत देखील आपलं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाईल.", असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढले.
दरम्यान, तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच मुंबई भेटीत मुंबईकरांना तीन हजार कोटींच्या प्रकल्पाची भेट दिली. शनिवार दि.१३ रोजी गोरेगाव नेसको सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम नेस्को सेंटर गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, "हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्बल आहे आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे सगळे प्रोजेक्ट आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात २०१८मध्ये आम्ही एक संकल्प केला होता की, मुंबईमध्ये कुठल्याही कुठल्याही भागांमध्ये केवळ ६० मिनिटाच्या आतमध्ये एका तासाच्या आत पोहोचता आलं पाहिजे, अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करायचा आहे. आज हे दोन प्रोजेक्ट आपण करतो आहे, ते आपल्या त्या उद्दिष्टांकडे अतिशय वेगाने अशीही वाटचाल आहे. आमच्या अंडरग्राउंड मेट्रोचं उद्घाटनही आपल्याच हस्ते होईल. मला विश्वास आहे की, हे उदघाटन होताच मुंबईतलं चित्र हे पूर्णपणे बदललेलं असेल. याचे संपूर्ण श्रेय हे मोदीजींना आणि महायुतीच्या सरकारला या ठिकाणी मिळेल", असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
गोरेगाव नेस्को सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मंचावर उपस्थित होते. यासह महायुतीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे याठिकाणाहून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.