नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार असून त्याच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या आहेत.लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 695 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील १४, महाराष्ट्रातील १३, पश्चिम बंगालमधील ७, बिहारमधील ५, ओडिशातील ५, झारखंडमधील ३, जम्मू – काश्मीरमधील १ आणि लडाखमधील एका जागेवर मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील दिंडोरी, भिवंडी, धुळे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, पालघर, मुंबई उत्तर पूर्व, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आदी प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.त्याचप्रमाणे लखनऊमधून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रायबरेलीतून राहुल गांधी, अमेठीतून स्मृती इराणी, हाजीपूरमधून चिराग पासवान आणि बारामुला येथून ओमर अब्दुल्लादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.