लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ केंद्रांची वाढ; गैरसोय टाळण्यासाठी निर्णय!
निवडणुकीसाठी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे
09-Apr-2024
Total Views | 42
मुंबई : लोकसभेचा रणसंग्राम तापू लागला आहे. युती-आघाडीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत. या निवडणुकीत राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत.
२००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. तर २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २००१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या ९८ हजार ११४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक मतदान केंद्रे पुण्यात
यंदा सर्वांत जास्त मतदान केंद्रे पुण्यात आहेत. याची संख्या ८ हजार ३८२ आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ३८०, ठाण्यात ६ हजार ५९२, नाशिकमध्ये ४ हजार ८०० आणि नागपूरमध्ये ४ हजार ५१० मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये ९१८ आणि गडचिरोलीमध्ये ९५० मतदान केंद्रे असणार आहेत.
मतदार केंद्रावर घेणार विशेष काळजी
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.