(West Bengal Governor)
कोलकाता : विश्व संवाद केंद्र आयोजित लक्ष्य या सोशल मीडिया कॉन्फ्लुएंसचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंदा बोस (आयएएस निवृत्त) यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्राचे विघटन आणि नाश करणाऱ्या नरेटिव्ह विरोधात लढा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "सोशल मीडियावर अशा प्रकारची बहुतांश नरेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सत्याची खरी माहिती दिली पाहिजे. भारत हे महान राष्ट्र आहे. हे सत्य साऱ्या जगाने ओळखले आहे. मात्र, आपल्या देशातील काही लोकांना हे अद्याप पचायला जड जात आहे. असे अशले तरी भारत आपली पुढची वाटचाल कायम सुरूच ठेवेल."
संदेशखाली महिला अत्याचार प्रकरणी राज्यपालांनी यावेळी अतिशय सूचक विधान केले आहे. तेथील गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवत संघटित झालेल्या नारीशक्तीबाबत ते म्हणाले, "संदेशखालीमध्ये आम्ही जे पाहिलं ते गुंडाराजच्या विरोधात महिलांचा उठाव होता. तिथे आपण स्त्रीशक्तीचा उदय पाहिला. संदेशखाली हे तीन हजार लोकसंख्येने दाट लोकवस्ती असलेले एक बेट आहे. याठिकाणी मुख्य भूभागाला जोडण्यासाठी पूल नाही. शेख शाहजहान आणि त्याच्या गुंडांनी तेथे केलेल्या अत्याचारांबद्दल जेव्हा कळले तेव्हा तातडीने तेथे जाण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनाही त्यावेळी सोबत घेतले. सुरक्षेची गंभीर समस्या लक्षात घेऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथे न जाण्याचा सल्ला दिला. असे असतानाही तिथवर पोहोचण्यात आम्ही यशस्वी झाले. महिलांना आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन दिले." सध्या ममता बॅनर्जींसोबत कोणताही वाद नसल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी स्वागत समितीचे अध्यक्ष के.सी. नरेंद्रन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यपालांच्या भाषणाबरोबरच रा.स्व.संघाचे केरळ प्रांत प्रचारक एस. सुदर्शनन, प्रख्यात चित्रपट निर्माते विष्णू मोहन, प्रतिष्ठित अभिनेता उन्नी मुकुंदन, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख एम. बालकृष्णन आणि विश्वराज यांचीही भाषणे झाली.