महाराष्ट्र : उपोषणकर्ते मनोज जरांगे हे पवार गटाकडून (मविआ) लोकसभा निवडणूक लढविणार, असा गौप्यस्फोट भाजप नेत्याने केला आहे. दरम्यान, जरांगेंना आधीपासूनच राजकीय महत्त्वांकाक्षा होती, त्यासाठीच त्यांनी मराठा आरक्षणाकरिता आंदोलन उभे केले असा दावादेखील भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी उचलून धरणारे जरांगे आता नव्या पेचात सापडले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. एकंदरीत, जरांगेंच्या उपोषणामागे मविआ नेत्यांचा हात आहे का, आणि तशा स्वरुपाचे गंभीर आरोपदेखील सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलेल्या दावामुळे राज्यात नवीन राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते देशमुख म्हणाले, राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोप करतानाच जरांगे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून 'मविआ'चे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या तयारीत शरद पवार गट असल्याची माहिती आहे. तसेच, मविआच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून शरद पवार गटाचे प्रयत्न असतील. देशमुख पुढे म्हणाले, सदर जागा शरद पवार गटाला मिळाल्यास तिथून मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले.