उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून संपावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना वॉरंटशिवाय अटक केली जाईल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून पुढील ६ महिन्यांसाठी राज्यातील संप आणि निदर्शनांवर बंदी घातली आहे.
त्याचबरोबर, येत्या सहा महिन्यांत राज्यात कोणताही कर्मचारी संपावर गेला किंवा आंदोलन केल्यास सरकार त्याला कठोरपणे सामोरे जाईल, असे योगी सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, संबंधित आंदोलनकर्त्यास पोलिस वॉरंटशिवाय अटक करू शकतात, असेही सरकारकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जात असून सरकारच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा (ESMA) लागू करण्यात आला आहे. हा आदेश पुढील ६ महिन्यांसाठी लागू राहील. तसेच, हा आदेश शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी विभाग, कॉर्पोरेशन आणि प्राधिकरणांना लागू असेल.