प्रयागचा महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ : पंतप्रधान
प्रयागराज येथे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
14-Dec-2024
Total Views | 62
1
नवी दिल्ली : “प्रयागराज ( Prayagraj ) येथील महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे ५ हजार, ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पितवृत्तीने कार्यरत असलेल्या कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचार्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या महाकुंभाची भव्य व्याप्ती आणि आकार विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे, जिथे ४५ दिवस चालणार्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. “पुढील वर्षी होणार्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि “एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल,” असा विश्वास व्यक्त केला. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी सांगितले की, “कुंभ आणि धार्मिक स्थळांकडे ती महत्त्वाची असूनही यापूर्वीच्या सरकारांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे श्रद्धाळूंना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा तुटलेला संबंध याला कारणीभूत आहे,” असे सांगून त्यांनी नागरिकांना दिलासा दिला की, “वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकारांना भारतीय परंपरा आणि श्रद्धा यांच्याप्रति सखोल आदर आहे.” ते म्हणाले की, “केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे कुंभासाठी येणार्या यात्रेकरूंना सुविधा पुरविणे ही आपली जबाबदारी मानतात. त्यांनी हजारो कोटींच्या निधीची विविध प्रकल्पांसाठी तरतूद केली असून कुंभाच्या तयारीसाठी केंद्र व राज्य सरकारे एकत्र येऊन काम करीत आहेत. अयोध्या, वाराणसी, रायबरेली आणि लखनौ आदी शहरांपासून प्रयागराजपर्यंतचा प्रवास सोयीस्कर व्हावा, याकरिता विशेष भर दिला जात आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. विविध सरकारी विभाग या भव्य सोहळ्याच्या तयारीसाठी करीत असलेल्या एकत्रित प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली व “हे प्रयत्न ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोन कृतीत उतरवित आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी ‘महाकुंभ २०२५’साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, तसेच प्रयागराजमध्ये अखंड संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी दहा नवीन रोड ओव्हर ब्रिज, कायमस्वरुपी घाट आणि नदीकिनार्यावरील रस्ते यांसारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. स्वच्छ आणि निर्मल गंगा याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधानांनी गंगा नदीकडे जाणार्या लहान नाल्यांचे अडथळे, टॅपिंग, वळणे आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पांचे उद्घाटनदेखील केले, ज्यामुळे प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा नदीत ’शून्य विसर्ग’ सुनिश्चित होईल. पिण्याचे पाणी आणि वीज यासंबंधीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले. भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, शृंगवेरपूर धाम कॉरिडॉर, अक्षयवत कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर यांसह प्रमुख मंदिर कॉरिडॉरचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे भाविकांना येथे सहज पोहोचणे शक्य होईल आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
कुंभमेळ्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल
“सुमारे दीड महिन्यासाठी संगमच्या काठावर एक तात्पुरते शहर वसवले जाईल, ज्याला दररोज लाखो लोक भेट देतील,” असे त्यांनी सांगितले. “या काळात प्रयागराजमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गरज भासेल,” असेही पंतप्रधान म्हणाले. “सहा हजारांहून अधिक नावाडी, हजारो दुकानदार तसेच धार्मिक विधी आणि पवित्र स्नानासाठी मदत करणार्यांना या काळात त्यांच्या कामात वाढ झालेली दिसेल, ज्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी व्यापार्यांना इतर शहरांमधून माल आणावा लागेल. कुंभमेळ्याचा प्रभाव आसपासच्या जिल्ह्यांवरही जाणवेल,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “इतर राज्यांतून येणारे यात्रेकरू रेल्वे किंवा हवाई सेवा वापरतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. कुंभमेळा केवळ समाजालाच बळकट करणार नाही, तर लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणातही योगदान देईल,” यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.