मविआच्या काळात गेलेला महाराष्ट्राचा गौरव परत आणणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आश्वासन
15-Nov-2024
Total Views | 43
चंद्रपूर : येत्या पाच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात गेलेला महाराष्ट्राचा गौरव परत आणण्याचे काम महायूतीचे सरकार करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले. चंद्रपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी हिंगोली, उमरखेड आणि चंद्रपूर विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा पार पडल्या.
चंद्रपूर येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे सरकार हवे की, औरंगजेब फॅन क्लबचे सरकार हवे, हे तुम्हाला ठरवायचे आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने राम मंदिर बनवले, कलम ३७० हटवले, ट्रिपल तलाक हटवला, सीएए कायदा आणला आणि आता वक्फ बोर्डाचा कायदा बलण्याची तयारीसुद्धा करण्यात येत आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाने प्रत्येक गोष्टीला विरोध केला. आम्ही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यादेवी नगर नामकरण केले. परंतू, या सगळ्याला त्यांनी विरोध केला."
"वर्षानुवर्षे गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे साम्राज्य होते. पण मोदीजींनी नक्षवादाला समाप्त करण्याचे काम केले. छत्तीसगडमध्ये शिल्लक असलेला नक्षलवाद आम्ही ३१ मार्च २०२६ च्या आधी समाप्त करणार आहोत. मोदीजींनी देशाला दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केले. देशाला समृद्ध करून जगात देशाचा सन्मान वाढवला. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी १५ लाख कोटी रुपये दिले. मात्र, महाविकास आघाडीने फक्त ३ लाख ९१ हजार कोटी दिलेत. यासोबतच मोदीजींनी महाराष्ट्राला असंख्य विकास प्रकल्प दिलेत. येत्या पाच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात गेलेला महाराष्ट्राचा गौरव परत आणण्याचे काम महायूतीचे सरकार करणार आहे," असेही ते म्हणाले.