मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS pathasanchalan) मद्रास उच्च न्यायालयाच्या कायदेशीर पाठिंब्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तमिळनाडूमधील एकूण ५८ ठिकाणी यशस्वीपणे पथसंचलन काढण्यात आले. विजयादशमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि संघ शताब्दी वर्ष सुरु होत असल्याने पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. इतक्या भव्य स्वरूपात निघालेेल्या पथसंचलनाची यंदाची ही पहिलीच वेळ आहे की जवळपास सर्व नियोजित ठिकाणी पथसंचलन यशस्वीपणे पार पडली आहेत. यावेळी तमिळनाडूतील लोकांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
हे वाचलंत का? : हिंदूंच्या धार्मिक सणांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत – विहिंपचा जिहाद्यांना इशारा
तमिळनाडूतील द्रमुक सरकारने सुरुवातीला विविध कारणे सांगत संघाच्या पथसंचलनास परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला. त्यांनंतर संघाने मद्रास उच्च न्यायालयाकडे याबाबतीत त्यांचा हस्तक्षेप मागितला असता त्यांनी पथसंचलनास परवानगी देण्यासाठी पोलिसांना मुदत दिली. असे असूनही, द्रमुक सरकारने नियोजित तारखेच्या एक दिवस अगोदर नकार जारी केला. त्यानंतरच्या झालेल्या सुनावणीत सरकारने ४२ ठिकाणी पथसंचलनाची परवानगी देण्याचे मान्य केले, तर १६ ठिकाणी प्रवेश नाकारला.
मद्रास हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या रॅलीसाठी वारंवार परवानगी नाकारल्याबद्दल कडक ताकीद दिली आहे आणि अशा कृती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या दोन्ही आदेशांचे उल्लंघन करतात यावर जोर दिला आहे. न्यायालयाने टिप्पणी केली की सरकारने दरवर्षी न्यायालयाच्या हस्तक्षेपावर अवलंबून राहण्याची गरज नाही. "इतर राज्ये पथसंचलनास परवानगी देत असताना, तामिळनाडू सरकार वेगळी भूमिका का घेते?" या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये एक सोडून सर्व ठिकाणी संघाने पथसंचलन केल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईमधील क्रोमपेट, एग्मोर, कोरात्तूर, मनाली, मेदावक्कम आणि पडियानाल्लूर यासह अनेक ठिकाणी पथसंचलने काढण्यात आली.