शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम; ही आहेत त्यामागची कारणे
07-Oct-2024
Total Views | 17873
मुंबई : इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळताना दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारात घसरण झाली असून सेन्सेक्स ६३८.४५ अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी ५० ८१,०५० पातळीवर बंद झाला. आरबीआय एमपीसी बैठकीत रेपो रेट संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणेदेखील यानिमित्ताने महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान, इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मध्य-पूर्वेतील संघर्षाच्या तीव्रतेमुळे, परदेशी गुंतवणूकदारांचे विक्री सत्र तसेच चीनी शेअर्समध्ये गुंतवणुकीला वाढता प्रतिसाद या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. विशेष म्हणजे चीनमधील बाजारपेठेचा वाढता पसारा परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स ०.७८ टक्के तर निफ्टी ५० ०.८७ टक्क्यांनी पडले. बीएसईच्या टॉप ३० कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. एम&एम, आयटीसी, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली आहे. तर एनएसईवर अदानी पोर्ट्सच्या समभागात सर्वाधिक घसरण दिसून आली. भारतीय बाजारातील घसरणीचा कल कायम आहे.