ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्ती योग्य वापरातुनच घडेल चांगला समाज व राष्ट्र - स्वामी स्वरुपानंद सरस्वती

    18-Oct-2024
Total Views | 18

pune
 
 
पुणे : "चांगला समाज, राष्ट्र हे पैशांनी किंवा समृद्धीने घडत नाही, तर माणसाच्या चांगल्या आचार-विचाराबरोबरच ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्तीचा यांच्या योग्य वापरातुन घडत असतो. त्यांच्या आधाराने जीवन परिपुर्ण करणारी माणसे आता घडविण्याची गरज आहे' असे मत स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी गुरुवारी व्यक्त केले.
 
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते राम नाईक यांना 'समाजभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
 
यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांना 'समाजस्नेह पुरस्कार', अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना 'युवा गौरव पुरस्कार', तर जेनेरीक आधार संस्थेचे अर्जुन देशपांडे यांना 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अंकित काणे, कार्याध्यक्ष अतुलशास्त्री भगरे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
 
दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील ९३ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक अरविंद मनोलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 
स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, "चारित्र्यसंपन्न माणसे निर्माण करण्यासाठी निःस्वार्थ व त्यागमयी जीवन जगणारी माणसे प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाली पाहीजे. साधु, संतच विद्‌वान, निःस्पृह निस्वार्थ असतात असे नाही, तर प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणारी व्यक्तीही तितकीच निःस्पृह ठरत असते. माणसात परिपक्वता व परिपुर्णता येण्यासाठी ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्ती अशा सद्‌गुणांची जोपासणा व्हायला पाहीजे. हेच मानवी जीवनाचे खरे अधिष्ठान आहे.'
 
नाईक म्हणाले,"आम्ही सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षामध्ये असतानाही समाजहीताला प्राधान्य दिले. कुष्ठरोगी नागरीकांसाठी भोजन भत्ता, युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी पेट्रोल पंप/गॅस एजन्सी वाटप, संसदेत, शाळांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करणे यांसारखी महत्वाची कामे केली, त्याचबरोबर लोकांची तातडीने कामे व्हावीत, यासाठी खासदार निधी देण्याची संकल्पना मांडुन त्याची अंमलबजावणी आम्ही केली.' पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व कृतज्ज्ञता व्यक्त केली. तर देशपांडे यांनी जेनेरीक आधार संस्थेच्या उभारणीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगरे गुरुजी यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
 
"संतांसमवेत एका व्यासपीठावर बसण्याचे भाग्य मला मिळाले. कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय कला क्षेत्रात काम करता येत नाही. त्यामुळे यापुढेही कुटुंब व समाजासाठी कायम काम करत राहील. पुरस्काराचा मनापासून आनंद झाला आहे."
 
- संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121