भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला झापले
बिश्नोई टोळीवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष
18-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : ( Randhir Jaiswal )भारताने कॅनडाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती केली होती. मात्र, कॅनडाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही; अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला सुनावले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील लोकांना अटक करण्यासाठी आम्ही कॅनडा सरकारला अधिकृत विनंती केली होती. मात्र, त्यांनी ही समस्या समजून न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे कॅनडाचा राजकीय हेतूही असल्याचे स्पष्ट दिसते. कॅनडाने गेल्या वर्षी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला. तेव्हा त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि केवळ गुप्तचर माहिती होती, हे जस्टिन ट्रूडो यांनी बुधवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी मान्य केले आहे. त्यामुळे कॅनडाने भारतीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे जयस्वाल यांनी म्हटले आहे. कॅनडाने या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा पुरावा अद्यापही दिला नसल्याचा पलटवार परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. जयस्वाल म्हणाले, “याप्रकरणी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅनडा सरकारने सप्टेंबर 2023 सालापासून भारतासोबत कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र, कॅनडाने वारंवार आरोप करणे सुरूच ठेवले असून त्यासाठी अद्यापही पुरावा दिलेला नाही. त्याचप्रमाणे, आता तर ट्रूडो यांनीच आरोपांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय राजनैतिक अधिकार्यांवरील आरोप भारत नाकारत आहे,” असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.