नवी दिल्ली : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. पण, याचसोबत सलमान खानला जो कुणी मदत करेल, त्याची सुद्धा हीच अवस्था केली जाईल असा धमकीवजा इशारा सुद्धा बिश्नोई गँगने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी बिश्नोई गँगच्या माणसांनी वांद्रे येथील सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार केला होता. या प्रकरणामुळे सलमान खान विरुद्ध बिश्नोई गँग या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलमान खान विरुद्ध लॉरेन्स बिश्नोई प्रकरण
२०२२ मध्ये सिद्धू मुसेवाला या प्रसिद्ध गायकाची हत्या केल्यानंतर बिश्नोई गँगची चर्चा व्हायला लागली. १९९८ साली सलमान खानच्या "हम साथ साथ हैं" या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान, सलमान खानवर काळवीट मारल्याचा आरोप केला गेला होता. काळवीट बिश्नोई समाजासाठी आस्थेचा विषय असल्यामुळे बिश्नोई समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. २०१८ साली लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले की सलमान खानला याच किंमत चुकती करावी लागेल. आम्ही त्याला जोधपुर मध्ये मारु. या प्रकरणानंतर सलमान खानशी निकटचे संबंध असलेल्या २ सेलिब्रिटीसची हत्या करण्यात आली होती. २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल याची बिश्नोई गँगकडून कॅनडामध्ये हत्या करण्यात आली होती. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, ग्रेवाल याने सलमान खान याला भावासारखी वागणूक दिली होती. त्यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंजाबी गायक एपी धिल्लन याची सुद्धा हत्या करण्यात आली होती. धिल्लन याने आपल्या गाण्यात सलमान खानला घेतल्यामुळे त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घराभोवती सुरक्षेची वाढ करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे अघटित घडू नये म्हणून मलाबार हिल या ठिकाणी देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ४८ वर्ष काँग्रेस मध्ये असणारे बाबा सिद्दीकी यांनी या वर्षीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.